प्रतिनिधी / दोडामार्ग:
तब्बल वर्षभरानंतर सोमवारपासून शाळांच्या घंटा वाजल्या आणि शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील दुरावा संपला. मोठय़ा अमाप उत्साहात आजपासून विद्यार्थी शाळांत दाखल झाले आणि शिक्षकांनीही त्यांचे त्याच आनंदात स्वागत केले. दोडामार्ग तालुक्यातील अनेक शाळांत हे आनंददायी चित्र पहावयास मिळाले.
ग्रामीण भागात 4 ऑक्टोबरपासून प्रशासनाने पाचवी ते बारावीच्या वर्गाना परवानगी दिल्यानंतर अपवाद वगळता पालकांनाही मुलांना शाळेत पाठविण्यास ग्रीन सिग्नल दिला. आणि विद्यार्थी व गुरुजीविना गेले वर्षभर ओस पडलेल्या शाळा गजबजून गेल्या. प्रत्येक गावांत अनेकांगाने विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. कोरोना संक्रमण कमी झाले असले तरी भीती संपलेली नाही. त्यामुळे
ग्रामीण भागातसुद्धा आवश्यक त्या खबरदारी घेत शिक्षकांनी शाळांमध्ये बैठक व्यवस्था व अध्यापनाचे नियोजन केले आहे.
दोडामार्ग तालुक्यातील नेहमीच शैक्षणिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या बोडदे शाळेत सुद्धा आज शाळा प्रवेशोत्सव मोठय़ा जल्लोषात झाला. यावेळी पालक, शिक्षक व मुलांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. या प्रशालेत मुलांची बैठक व्यवस्था
एका वर्गखोलीत एक वर्ग अंतर ठेवून करण्यात आली आहे. मुलांचे शारीरिक तापमान व एसओटुच्या तपासण्या दररोज होणार असून, सॅनिटायझरचा व साबणाचा वापर सुद्धा नियमित करण्याबाबत शाळांनी पुढाकार घेतला आहे. पालकांना व मुलांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या असून या कोरोना महामारीपेक्षा तब्बल वर्षांने शाळेत यायला मिळाले याच मोठे समाधान विद्यार्थ्यांत आहे.
बोडदे येथे या प्रवेशोत्सव कार्यक्रमाला पालक श्रीकृष्ण गवस, महेश पारधी, दिव्या गवस, संदीप नाईक, उदय घाडी, कृपा गवस, गौरी गवस, अंकिता सावंत, तुळशीदास गवस, आकाश पारधी, विश्वजीत गवस, गुरुदास जाधव, सतीश सुतार, राजन नाईक, संदीप नाईक, अश्विनी गवस, नारायण गवस, यांच्यासह मुख्याध्यापक महेश नाईक व उपशिक्षक सखाराम झोरे व पूनम खोराटे उपस्थित होते. शाळेला शुभारंभप्रसंगी केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक व शिक्षण विस्तार अधिकारी सौ. छाया बाळेकुंद्री तथा गटशिक्षणाधिकारी एन. नदाफ यांनी शुभेच्छा दिल्या.