उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन : विर्नोडा पेडणे येथे संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय संकुलाचे उद्घाटन
प्रतिनिधी / पेडणे
माहिती तंत्रज्ञान युगात देशाचा चौफेर विकास होत आहे. शिक्षण क्षेत्रातही विविध प्रयोग होत असताना गोवा राज्य शिक्षण क्षेत्रात देशातील एक अग्रगण्य राज्य म्हणून नावारूपास येत आहे. त्यासाठी सर्वांनी आणि खास करून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम तसेच उत्कृष्ट कामगिरीद्वारे आपला ठसा सर्व क्षेत्रात उमटवावे जेणेकरून आपल्या राज्याची ओळख देश आणि जागतिक पातळीवर पोहोचेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विर्नोडा पेडणे येथे केले.
विर्नोडा पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय संकुलाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सोहळय़ाला खास निमंत्रित पाहुणे राज्यपाल श्रीधरन पिलाई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे, राज्याचे मुख्यसचिव परिमल राय व्यासपिठावर उपस्थित होते.
गोव्यात उत्कृष्ट साधन सुविधा
उपराष्ट्रापती व्यंकय्या नायडू पुढे म्हणाले की, गोवा राज्यात साधनसुविधा चांगल्या असून सरकार मार्फत विविध क्षेत्राचा विकास होत आहे. शिक्षण क्षेत्रात चांगल्या साधनसुविधांद्वारे आज शिक्षण क्षेत्र प्रगतशील होत आहे. माहिती तंत्रज्ञान विभागात सर्व क्षेत्राचा अभ्यास करणे आणि उत्कृष्ट कामगिरी करून नावलौकिक प्राप्त करावे, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. अठराव्या शतकातील संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या नावाने आज हे सर्व साधनसुविधायुक्त महाविद्यालय पेडण्याच्या भूमीत उभे राहिले आहे. या महाविद्यालयातून चांगले विद्यार्थी घडावे. सरकारने चांगला अभ्यासक्रम आणून सरकारी महाविद्यालयाचा लौकिक वाढवावे, असेही ते म्हणाले.
आपला स्तर उंचावण्यासाठी उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्याद्वारे गोव्याची ओळख देशपातळीवर आणि जागतिक स्तरावर होईल. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्राचा विकास झालेला आहे. अनेक साधनसुविधांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यांचा उपयोग करुन विद्यार्थ्यांनी राज्याचे नाव उज्ज्वल करावे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
विद्यार्थ्यांनी थोर मरापुरुषांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवावा
भारत सरकारने शैक्षणिक धोरण 2020 लागू केले असून या धोरणानुसार शैक्षणिक क्षेत्राचा विकास होणार आहे. शिक्षणात आणि अभ्यासक्रमात नवीन क्रांती घडवून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात बदल व्हायला पाहिजे. थोर महापुरुषांचा इतिहास, आपली संस्कृती भावी पिढी समजणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श घेऊन क्रांती घडविणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आदी थोर पुरुषांची ओळख अभ्यासक्रमातून होणे गरजेचे आहे. या भारत देशाच्या अमृत महोत्सवी वषी शिक्षण क्षेत्रात विविध अमुलाग्र बदल होत आहेत. या बदलामुळे येणारा भविष्यकाळ उज्ज्वल असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी बहुआयामी तसेच सर्व क्षेत्रातील ज्ञान संपादन करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन नायडू यांनी केले.
परत एकदा भारताला विश्वगुरू करण्याची आवश्यकताः उपराष्ट्रपती
भारत हा पूर्वी विश्वगुरु होता आणि त्यामुळे विदेशातील अनेक विद्यार्थी हे भारतात शिक्षण घेण्यासाठी येत होते. आता पुन्हा एकदा तशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्या परिस्थितीनुसार भारत देशात विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येणार आहेत. त्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करुन देण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी भावी पिढीला चांगले नीतिमूल्य देणे तेवढेच गरजेचे आहे. त्याद्वारेच भारत हा जगात विश्वगुरू होईल, असे उपराष्ट्रपती नायडू म्हणाले.
गोव्याची देशात आणि विदेशात वेगळी ओळख आहे. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर, पद्मश्री रेमो फर्नांडिस आदीं आपल्या कीर्तीने जागतिक स्तरावर गोव्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांचा आदर्श, त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन युवापिढीने मार्गक्रमण करावे, असे आवाहन केले.
देशाचे बलस्थान युवा पिढी
युवक हा तंदुरुस्त असायला पाहिजे. युवा पिढी ही देशाचे बलस्थान आहे. सर्व क्षेत्रात उत्कृष्ट होण्यासाठी त्यांनी मेहनत केली पाहिजे. अभ्यासात लक्ष लागण्यासाठी युवकांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी युवकाने व्यायाम तसेच योगासने करावी. युवकांनी फ्रोजन फूड तसेच बर्गर, पिझ्झा वगैरे खाणे टाळावेत. घरगुती शिजवलेल्या अन्नाला प्राधान्य द्यावे असे सांगून त्यांनी युवकांना भावी वाटचालीसाठी सक्षम नागरिक म्हणून विविध क्षेत्रात आपलं नावलौकिक प्राप्त करा असे सांगून शुभेच्छा दिल्या.
शिक्षण क्षेत्रात गोवा राज्य प्रथम क्रमांकावरः मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात गोवा राज्य प्रथम क्रमांकावर आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विविध प्रकारच्या साधन सुविधा, शैक्षणिक सुविधा गोवा सरकारने राज्याला दिले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रगतिशील राज्य म्हणून गोव्याचा लौकिक आहे. आज विविध प्रकारचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सरकारने ठोस पावले उचललेली आहे. आयपीएस, आयएएस आणि बँकिंग क्षेत्रातील परीक्षा देण्यासाठी गोव्यातील सहाही सरकारी महाविद्यालयात प्रशिक्षण केंद्र उघडले जाईल. त्यासाठी मार्गदर्शक ठवले आहेत. तुमची जिद्द, चिकाटी भविष्यात तुमचे उज्ज्वल, सुखकर जीवन घडण्यासाठी उपयोगी पडणार आहे. माध्यमिक स्तरावर आपणास योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. आजच्या इंटरनेट युगाचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो त्यावर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
ड़ पेडणे ही संतांची व कलाकारांची भूमी
पेडणेच्या भुमीला इतिहास आहे. या भूमीत अनेक नामवंत कलाकार आणि संत, स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. या भूमीत आज हे महाविद्यालय सर्व सोयींयुक्त होत आहे आणि त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी तालुक्मयातील तसेच सिंधुदुर्ग जिह्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही आनंदाची बाब आहे तसेच अभिमानाची बाब असून संत-महात्मांचा आणि कलाकारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
स्वागतपर भाषण उपमुख्यमंत्री तथा पेडणे मतदारसंघाचे आमदार बाबू आजगावकर यांनी केले. आभार मुख्यसचिव परिमय राय यांनी मानले.