प्रा. विक्रम पाटील यांचे प्रतिपादन : काळी आमराई येथील सह्याद्री सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात
प्रतिनिधी / बेळगाव
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून व सखोल अभ्यास करून त्यामध्ये प्रगती साधली पाहिजे. निवडलेल्या क्षेत्रात अभ्यासाबरोबरच सामाजिक, राजकीय व भौगोलिक परिस्थितीची जाण असणे आवश्यक आहे. कोणत्याही नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीला गेल्यावर चौकसवृत्तीने मुलाखतीला सामोरे जावे व विद्यार्थ्यांनी आपले छंदही जोपासावेत, असे प्रतिपादन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव व सह्यादी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन प्रा. विक्रम पाटील यांनी केले.
ते शनिवार दि. 30 रोजी काळी आमराई येथील सह्याद्री मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या तिसाव्या वर्धापनदिन कार्यक्रमात सभासदांच्या गुणी मुलांच्या सत्कारप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष व सोसायटीचे ज्येष्ठ सल्लागार ऍड. राजाभाऊ पाटील होते.
प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थिनीनी स्वागत गीत सादर केले. चेअरमन पी. पी. बेळगावकर यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेऊन संस्थेकडे 1 कोटी 53 लाख 4 हजार भागभांडवल आहे. ठेवी रु. 172 कोटी 73 लाख आहेत. गुंतवणूक 49 कोटी 67 लाख, कर्जे रु. 118 कोटी 93 लाख, राखीव इतर निधी 14 कोटी 55 लाख असून खेळते भांडवल 184 कोटी 59 लाख आहे. व संस्थेने राबविलेल्या विविध योजनांची व शैक्षणिक कार्याची माहिती दिली.
गुणवंत मुलांचा सत्कार
त्यानंतर सभासदांच्या गुणी मुलांचा सत्कार रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन करण्यात आला. यावेळी ऍड. राजाभाऊ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास व्हा. चेअरमन गोपाळराव कातकर, संचालक सर्वश्री एन. बी. खांडेकर, आर. बी. बांडगी, के. एस. पाटील, एस. के. कदम, प्राचार्य एम. बी. निर्मळकर, प्राचार्य ए. व्ही. पाटील, शिवाजी आढाव, विजय भोसले, एस. एम. कांबळे, सुजाता मायाण्णाचे, शितल कोकितकर, माजी चेअरमन अनिता कोकितकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, कायदे सल्लागार पी. एस. पाटील यांच्यासह सर्व शाखांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सल्लागार मंडळ, कर्मचारी, पिग्मी संकलक व हितचिंतक उपस्थित होते. अनिल कणबरकर यांनी सूत्रसंचालन केले.