वार्ताहर / सरूड
देशातील वास्तवाचे डोळसपणे आकलन करुन आपल्या ज्ञानाचा उपयोग विधायक नवनिर्मितीसाठी करण्याची गरज आहे. तरुणांनी आपली प्रतिभा देशाच्या प्रगतीसाठी वळविण्याची गरज आहे,असे प्रतिपादन माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांनी केले.
श्री शिव शाहू महाविद्यालय ,सरुडच्या द्वितीय पदवी प्रदान समारंभात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते .प्रारंभी सर्व मान्यवरांचे मिरवणूकीने कार्यक्रम स्थळी आगमन झाले .दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक प्र.प्राचार्य डॉ.जी.एच.आळतेकर यांनी केले.
यावेळी बोलताना बाबासाहेब पाटील सरुडकर म्हणाले ,सध्याच्या काळात स्पर्धा प्रचंड वाढली आहे.या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रगतीचा वेग वाढविला पाहिजे.विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून आव्हानांना सामोरे जाण्याची गरज आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे भूगोलशास्त्र विभागप्रमुख डॉ.सचिन पन्हाळकर म्हणाले, यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमांची तयारी ठेवली पाहिजे .अडचणींना न घाबरता पुढे जाण्याची जिद्दच यशापर्यंत घेऊन जाते.त्यामुळे आपले ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील रहावे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्नातकांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. कार्यक्रमास अधिसभा सदस्य डॉ.अरुण पाटील, युवराज पाटील सरुडकर, बाळकृष्ण इंदुलकर, डॉ. भानुदास गाडवे,बाळासाहेब पाटणकर, आदींसह प्राध्यापक ,विद्यार्थी ,पालक, ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रा.प्रकाश नाईक यांनी केले तर आभार प्रा.एस.एम. पाटील यांनी मानले.