प्रतिनिधी/ बेळगाव
मातीशी प्रामाणिक राहिले की ती भरभरून देते. शेतीमध्ये आत्मसन्मानजनक करिअर करता येते. शेतीपासून दूर राहणाऱया विद्यार्थ्यांनी पुन्हा शेतीकडे वळण्याची आज गरज आहे. सेंद्रिय शेती हा तर अनेक समस्यांवरचा रामबाण उपाय आहे, असे मत सेंद्रिय शेतीतज्ञ तेजस्वी नाईक यांनी व्यक्त केले.
एसकेई सोसायटी संचालित आरपीडी महाविद्यालयामध्ये सेंद्रिय शेती अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून तेजस्वी बोलत होते. अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा बिंबा नाडकर्णी होत्या. आरपीडीच्या युथ रेडक्रॉस विंग व इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सहा आठवडे चालणारा हा अभ्यासक्रम ऑनलाईन असून दोन दिवस प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत.
तेजस्वी म्हणाले, एकूण 30 विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. शेतीसंदर्भात असलेला अनुभव विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. बिंबा नाडकर्णी म्हणाल्या, विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणारे उपक्रम राबविण्यात महाविद्यालय नेहमीच आघाडीवर राहिले आहे. शेतीकडे आधुनिक दृष्टिकोनातून बघण्यासाठी हा अभ्यासक्रम मदत करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. इनरव्हील क्लबच्या सचिव मंजिरी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्राचार्या डॉ. अचला देसाई यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली. रोपटय़ाला पाणी घालून अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापन सदस्या लता कित्तूर, युथ रेडक्रॉस कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आय. कितली, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, आशा नाईक आदी उपस्थित होते. अमिना शेख हिने सूत्रसंचालन केले. दक्षता हिने आभार मानले.