विठ्ठल हलगेकर यांचे प्रतिपादन : शांतीनिकेतन शाळेत पालक मेळावा उत्साहात
वार्ताहर /खानापूर
आजचा विद्यार्थी हा भविष्यातील प्रज्ञावंत नागरिक बनला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला पालकांनी जिद्द व चिकाटीसह आधुनिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना संक्रमणाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडीच ढासळली. अशात प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण घेताना कसरत करावी लागली. यासाठी भविष्यातील शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी व गेल्या दोन वर्षात ढासळलेली शैक्षणिक गुणवत्ता मार्गी लावण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने जिद्द व चिकाटी बाळगून अभ्यासात गुंतले पाहिजे. यासाठी प्रत्येकांनी आपल्या पाल्यावर लक्ष असणे आवश्यक असल्याचे विचार तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी शांतीनिकेतन पब्लिक शाळेच्यावतीने आयोजित पालक स्नेहमेळावाप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी प्राचार्या स्वाती वाळवे यांनी शैक्षणिक आढावा घेऊन स्वागत केले. दीपप्रज्वलन शाळेचे चेअरमन प्रा. भरत तोपिनकट्टी, सचिव राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल करंबळकर, चांगाप्पा निलजकर, यल्लाप्पा तिरवीर आदींच्या हस्ते झाले.
यावेळी प्रा. भरत तोपिनकट्टी म्हणाले, पालक व बालक यांच्यामध्ये समविचार व भावनिक संबंध असणे आवश्यक आहे. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व मुलांच्यामध्ये शैक्षणिक विकास घडविण्यासाठी प्रेरणा व मुलांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. यासाठी पालकांनी मुलांवर अधिक बंधणे न लादता प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे विचार मांडले.
या पालक मेळाव्याच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जादूगार प्रेमानंद पाटील कसबा नंदगड यांचा जादूचा प्रयोग झाला. सूत्रसंचालन मनीषा भोसले यांनी तर आभार नंदा जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला पालक, शिक्षक उपस्थित होते.