शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने बसपास वितरणाच्या कामाला परिवहन मंडळाकडून गती
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या 9 महिन्यांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने बसपासचे काम गतिमान झाले आहे. कोरोनामुळे बऱयाच काळासाठी बससेवा बंद होती. त्यामुळे बसपासच्या कामाला स्थगिती मिळाली होती. मात्र, आता पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयांपाठोपाठ दहावी व बारावीचे वर्गदेखील सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी बसपास बंधनकारक बनला आहे. यंदा बसपासची प्रक्रिया बदलली असून ऑनलाईनद्वारे बसपास प्रक्रिया चालणार आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत बसस्थानकातील बसपास विभागात 2 हजारहून अधिक बसपास वितरण करण्यात आले.
बसपास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असली तरी बसपासची प्रक्रिया बदलल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळण्यास उशीर होत आहे. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली की विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जायचा. मात्र बसपाची प्रक्रिया बदलली आहे. विद्यार्थ्यांना बसपास मिळवायचा असल्यास सेवा सिंधू स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर अर्ज केलेली पावती बस विभागात जमा करावी लागणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची छाननी करून बसपास उपलब्ध होणार आहे.
पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये 17 नोव्हेंबरपासून सुरू झाली. त्यानंतर शासनाने दहावी-बारावीचे वर्ग सुरू करण्याबरोबर सहावी, सातवी इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यागम प्रणाली सुरू केली. दरम्यान, परिवहनने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचा प्रवास जुना बसपास व शुल्क पावती दाखवून सुरू आहे.
बसस्थानकाच्या बसपास विभागात गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून सुरू झालेली बसपास प्रक्रिया गतिमान झाली आहे. परिवहनने यंदा बसपासची प्रक्रिया बदलून ऑनलाईनची व्यवस्था केल्याने विद्यार्थ्यांची धावपळ उडत आहे. शिवाय बसपासचे कामही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे तातडीने बसपास उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.