कणकवली ते सावंतवाडी विद्युतीकरण पूर्ण : निवसर ते कणकवली विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर
अजय कांडर / कणकवली:
कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता रत्नागिरी ते गोवा-ठोकुर असे विद्युतीकरणाचे काम जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यात कणकवली ते सावंतवाडीपर्यंतचे काम पूर्ण झाले असून निवसर ते कणकवली यादरम्यानचे काम सध्या गती घेत आहे. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचा मार्ग पूर्णत: पर्यावरणपूरक होणार असून इंधन बचतही होणार आहे. शिवाय कोकण रेल्वेचे काही कोटी रुपये त्यामुळे वाचणार आहेत.
कोकण रेल्वे मार्ग पूर्ण सुरक्षित करण्याच्यादृष्टीने कोकण रेल्वे व्यवस्थापनाने पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरण जलदगतीने होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गावर विद्युतीकरणाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने उभारण्यात आली आहे. आता रत्नागिरी ते पुढे गोवा ठोकुरपर्यंत रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत मार्गी लावण्याचे प्रयत्न कोकण रेल्वेकडून सुरू आहेत. सध्या कणकवली ते सावंतवाडी मार्गावरच्या विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले असून निवसर ते कणकवली दरम्यानचे काम सध्या करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी होणार आहे. त्यानंतरच कोकण रेल्वे मार्गावर विजेवर गाडय़ा सुरू करण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वे मार्ग हा खडतर मार्ग म्हणून ओळखला जातो. जगातील सर्वाधिक कठीण मार्गावरून रेल्वे नेण्यात आली, असं चित्र कोकण रेल्वे मार्गाचे उभे करण्यात आले आहे. निसर्गसंपन्न कोकणमध्ये पर्यावरणपूरक कोकण रेल्वे प्रकल्प उभारावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. डिझेलवर धावणाऱया कोकण रेल्वेच्या इंजिनामुळे धूर पसरतो आणि पर्यावरणाला हानी पोहोचते. मात्र, आता कोकण रेल्वेचा पूर्ण प्रवास पर्यावरणपूरक होणार आहे. तसेच इंधन खर्चातही मोठी बचत होणार आहे.
दरम्यान, कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचीही कार्यवाही सुरू आहे. परंतु चिपळूण-कराड या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत अजूनही शासनस्तरावरून कोणत्याही हालचाली सुरू नसल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.