मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे स्पष्टीकरण
बेंगळूर : विधानपरिषदेत मंगळवारी घडलेल्या अनुचित घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले आहे. निजद आणि भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारीच राज्यपालांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे मंत्र्यांची मते जाणून घेऊन पुढील पाऊल उचलण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. उडुपीच्या पलिमारु मठाचे विद्याधीशतीर्थ स्वामींजींची बेंगळूरच्या मल्लेश्वरम येथे भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. विद्याधीशतीर्थ स्वामीजींनी प्रथमच मल्लेश्वरम येथील मठाला भेट दिल्याने आपण त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. स्वामीजी अध्यात्मिक साधनेसह सामाजिक कार्यातही गुंतले आहेत. सुमारे 36 हजार विद्यार्थ्यांना अन्नदासोह (भोजन) कार्यक्रम चालवतात, अशी माहिती त्यांनी दिली.