खानापूर तालुका ग्रा.पं.-नगरपंचायत सदस्यांच्या मेळाव्यात आवाहन : काँग्रेस पदाधिकाऱयांची उपस्थिती
प्रतिनिधी /खानापूर
केंद्रातील आणि कर्नाटकातील भाजप शासनाकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. यामुळे आता जनता भाजपला वैतागली असून आगामी काळात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचीच राजवट येणे गरजेचे असल्याची भावना जनतेमध्येच झाली आहे. याची सुरुवात म्हणून विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांना खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायत व नगरपंचायत सदस्यांनी पहिल्या पसंतीची मते देऊन प्रचंड मताने विजयी करावे, असे आवाहन कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी खानापूर येथील पाटील गार्डनमध्ये आयोजित केलेल्या तालुक्यातील ग्राम पंचायत तसेच नगरपंचायत सदस्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर होत्या.
यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष म्हणजे 7ƒ24 तास कार्य करणारा पक्ष आहे. या पक्षाने देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी बरीच कामे केली आहेत. तीच कामे आता केवळ नावे बदलून केंद्रातील व राज्यातील भाजप शासनकर्ते करीत आहेत. राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून गेल्या तीन वर्षात गरिबांसाठी एकही घर मंजूर केले नाही. राज्यातील सर्व विकासकामे राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे रखडली आहेत. या सर्व गोष्टी डोळय़ासमोर ठेवून जनतेने आता यापुढे काँग्रेसच्या पाठिशी खंबीरपणे राहण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी बोलताना बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, काँग्रेस पक्षाने विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रथमच खानापूर तालुक्यातील उमेदवारालाच संधी दिली आहे. यामुळे खानापूर तालुक्यातील सर्व ग्रा. पं. सदस्यांनी तसेच नगरपंचायत सदस्यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास डोळय़ासमोर ठेवून पहिल्या पसंतीचे मतदान चन्नराज हट्टीहोळी यांनाच द्यावे, अशी विनंती केली.
अध्यक्षीय भाषणात आमदार अंजली निंबाळकर यांनी केंद्रातील मोदी शासनाने पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवूनच तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. त्यांना शेतकऱयांविषयी कोणताच कळवळा नाही. त्यांना खऱया अर्थाने शेतकऱयांचा कळवळा असता तर गेले 16 महिने आंदोलन करणाऱया शेतकऱयांची त्यांनी एकदा तरी भेट घेतली असती. एवढेच नव्हे तर शेती कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱयांनी केलेल्या आंदोलनात जवळजवळ सातशे शेतकऱयांना आपले जीव गमवावे लागले. तरीही केंद्रातील मोदी शासनाला जाग आली नाही. तीच परिस्थिती आता देशातील व राज्यातील इतर विकासकामांची झाली आहे. खानापूर तालुक्याचा विचार करता गेल्या साडेतीन वर्षात तालुक्यातील प्रत्येक गावातील एका तरी विकासकामाला मी चालना दिली आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला अधिक बळ प्राप्त व्हावे, याकरिता विधानपरिषद निवडणुकीत आपल्या तालुक्यातील रहिवासी असलेल्या चन्नराज हट्टीहोळी यांनाच पहिल्या पसंतीचे मतदान करावे, अशी विनंती केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विनय नावलगट्टी, कर्नाटक प्रदेश युवा काँग्रेस सरचिटणीस मृणाल हट्टीहोळी तसेच विधानपरिषद निवडणुकीतील खानापूरचे प्रभारी अडिवेश इटगी यांनीही आपल्या भाषणात तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याची विनंती केली.
तालुक्यातील ग्रा. पं. सदस्यांच्यावतीने निलावडे ग्रा. पं. सदस्य रमेश देसाई तसेच लिंगनमठ ग्रा. पं. सदस्य काशीम हट्टीहोळी यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील सर्व ग्रा. पं. सदस्य आपल्या पहिल्या पसंतीचे मतदान चन्नराज हट्टीहोळी यांना करतील, अशी ग्वाही दिली. याच मेळाव्यात काँगेस पक्षाच्यावतीने किसान विजय दिन पाळण्यात आला. यावेळी तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱयांनी उभारलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱयांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असली तरी ते पूर्णतः मागे घेईपर्यंत तसेच इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. त्या मोर्चाला यापुढेही पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यासपीठावर बेळगाव बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, खानापूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, ग्रामीण अध्यक्ष मधू कवळेकर, महिला अध्यक्षा गीता अंबडगट्टी, सुनीता दंडगल तसेच काँग्रेस मानव हक्क विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी उपस्थित होते. या मेळाव्याला जवळपास सहाशे ग्रा. पं. सदस्य व नगरपंचायत सदस्य उपस्थित होते.