ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपनेत्या निलम गोऱ्हे यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. मुंबईत होणाऱ्या या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद अधांतरीत आहे. मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यपद आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी म्हणून राज्य मंत्रिमंडळाने दोन वेळा शिफारस केली होती. मात्र, राज्यपालांनी तीन आठवडे या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केली.
त्यानुसार राज्याच्या राजकारणातील अस्थिरता दूर करण्यासाठी राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.