प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य प्रतापचंद्र शेट्टी हे 2018 पासून सभापतीपदी आहेत. राज्यात आता भाजपची सत्ता असून निजदने काँग्रेसला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याने आणि भाजप अविश्वास ठराव मांडणार असल्याने प्रतापचंद्र शेट्टी यांच्यावर सभापतीपद सोडण्याची नामुष्की ओढवली आहे दरम्यान, उपसभापतीपदासाठी भाजपचे विधानपरिषद सदस्य एम. के. प्राणेश यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. तर सभापतीपद निजदसाठी सोडून देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे सभापतीपदी बसवराज होरट्टी यांची निवड होणार असल्याचे स्पष्ट आहे.
गुरुवारपासून विधिमंडळ अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. विधानपरिषदेचे उपसभापती एस. एल. धर्मेगौडा यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आपल्या निवासस्थानी भाजपच्या विधानपरिषद सदस्यांशी औपचारिकपणे चर्चा केली. या बैठकीत सर्व सदस्यांनी प्राणेश यांची उपसभापतीपदी निवड करण्यास संमती दर्शविली. तसेच सभापतीपद निजदला देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे भाजपतर्फे एम. के. प्राणेश उपसभापतीपदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी 3 पर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ असून प्राणेश दुपारी 1.45 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
देवेगौडांकडून प्रयत्न
गुरुवारी सकाळी माजी पंतप्रधान आणि निजद सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी येडियुराप्पांशी फोनवरून संपर्क साधून सभापतीपद आपल्या पक्षाला देण्याची मागणी केली. त्याबदल्यात उपसभापतीपद भाजपला देण्याची इच्छा बोलून दाखविली होती. त्यानुसार भाजपने निजदला सभापतीपद देण्यास होकार दर्शविला आहे. तर उपसभापती निवडणुकीवेळी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय निजदने घेतला आहे.
विधानपरिषदेत भाजपकडे 31 सदस्यबळ आहे. तर काँग्रेसकडे 28 आणि निजदजवळ 13 सदस्य आहेत. त्यामुळे निजदच्या पाठिंब्यावर भाजपच्या प्राणेश यांची निवड निश्चित झाली आहे. तर निजदने सभापतीपदासाठी बसवराज होरट्टी यांचे नावाचा विचार केला असून त्यांची देखील भाजपच्या पाठिंब्यावर सहजपणे निवड होणार आहे. मात्र, काँग्रेसतर्फे दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्यात येईल का?, याविषयी राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.