ऑनलाईन टीम/तरुण भारत
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार पुन्हा एकदा संतापलेत. त्यांनी रागाच्या भरात बिहार विधानसभेचे सभापती विजय सिन्हा यांची सुद्धा खरडपट्टी केली. विधानसभेत रागामुळे तीळपापड झालेले बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सभापती सिन्हा यांना चक्क राज्य घटना पाहण्याचा सल्ला दिला. सोमवारी विधिमंडळाचे सत्र सुरू होताच भाजप आमदार संजय सरावगी यांनी लखीसरायमध्ये 52 दिवसांत 9 खून झाल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यांना संबंधित मंत्र्यांकडून पोलीस काय काम करतायत याचे उत्तर हवे होते. याप्रकरणी एकच गदारोळ उडाला. त्यामुळे नीतीश कुमार अतिशय नाराज झाले. त्यांनी सभागृहातच गोंधळ घालणाऱ्या प्रत्येकाची खरडपट्टी केली. त्यातच सभापती विजय सिन्हाही त्यांच्या तावडीत सापडल्याने त्यांनाही चांगलंच फटकारलं.
दरम्यान, आपला मतदारसंघ असलेल्या लखिसरायमध्ये घडलेल्या घटनेबाबत काय कारवाई केली याची सभागृहाला माहिती द्यावी, असे अध्यक्षांनी मंत्री बिजेंद्र यादव यांना दोन दिवसांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उठून संताप व्यक्त केला. ‘सरकारच्या वतीने उत्तर देण्याचे अधिकार मंत्र्यांना देण्यात आले आहेत. या घटनेबाबत चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले असताना, तुम्ही त्यांना दोन दिवसांनंतर पुन्हा उत्तर द्यायला सांगता. हे नियमाविरुद्ध आहे. कृपया घटनेत काय लिहिले आहे ते पाहा’, असे कुमार म्हणाले.