बसवकल्याणमध्ये भाजपचा अनपेक्षित विजय
काँग्रेसचे आमदार नारायणराव यांच्या निधनामुळे बिदर जिल्हय़ाच्या बसवकल्याण विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजपची सरशी झाली असून शरणू सलगार विजयी झाले आहेत. येथील अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या उमेदवार मल्लम्मा बी. नारायणराव यांना 20,629 मतांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. विजयी उमेदवार सलगार यांना 71,012 तर मल्लम्मा यांना 50,108 मते मिळाली. निजद उमेदवार सय्यद यस्रब काद्री यांना केवळ 11,390 मतांवर समाधान मानावे लागले. 28 फेऱयांमध्ये झालेल्या मतमोजणीत सलगार सुरुवातीपासूनच आघाडीवर राहिले. या मतदारसंघातून 12 उमेदवार रिंगणात होते.
पक्षातर्फे तिकीट न मिळाल्याने भाजपविरोधात शड्डू ठोकून अपक्ष उमेदवार म्हणून पोटनिवडणूक रिंगणात उतरलेल्या मल्लिकार्जुन खुबा यांना मतदारांनी झिडकारले आहे. त्यांना केवळ 9,390 मते पडली आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 40,153 मते पडली होती, हे विशेष. तर 2013 मध्ये ते निजदच्या तिकिटावर निवडून आले होते. नंतर त्यांनी भाजपप्रवेश केला होता. मात्र, या पोटनिवडणुकीत त्यांच्याऐवजी शरणू सलगार यांना भाजपने रिंगणात उतरवले. त्यामुळे मल्लिकार्जुन खुबा यांनी बंडखोरी केली. परिणामी, भाजप नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मतमोजणी अखेर भाजपचे अधिकृत उमेदवार सलगार हेच वरचढ ठरले. भाजपमधील दुफळीचा आणि अनुकंपा आधारे दिवंगत आमदार नारायणराव यांच्या पत्नी मल्लम्मा यांना लाभ मिळेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा होता. तथापि, हा अंदाज फोल ठरल आहे.
निजदची रणनीती फोल
बसवकल्याणमधील अल्पसंख्याक मतदारांची मते मिळवून विजयाची रणनीती आखलेल्या निजदला यश मिळाले नाही. परंतु, काँग्रेस उमेदवाराचे मात्र नुकसान झाले. निजद उमेदवार सय्यद यस्रब काद्री यांना 11,390 मते मिळाली. त्यामुळे काँग्रेस उमेदवार मल्लम्मा यांना मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच पिछाडीवर रहावे लागले. या मतदारसंघात मागील तीन निवडणुकांमध्ये म्हणजेच 2008 मध्ये भाजप, 2013 मध्ये निजद आणि 2018 मध्ये काँग्रेस उमेदवार निवडून आले होते.
मस्की मतदारसंघात काँग्रेस पुन्हा वरचढ
आमदार प्रतापगौडा पाटील यांचा राजीनामा आणि पक्षांतरामुळे रायचूर जिल्हय़ातील मस्की विधानसभा मतदारसंघातही 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढविलेल्या प्रतापगौडा यांना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. भाजपसाठी येथील निवडणूक प्रतिष्ठेची होती. पण, मागील विधानसभा निवडणुकीत केवळ 213 मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या बसवनगौडा तुर्विहाळ यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत तब्बल 30,606 मताधिक्क्यांनी विजय संपादन केला आहे.
मस्की मतदारसंघात काँग्रेसचे विजयी उमेदवार बसवनगौडा तुर्विहाळ यांना 86,337 तर भाजपचे पराभूत उमेदवार प्रतापगौडा पाटील यांना 55,731 मते पडली. मतदानाच्या पहिल्या फेरीपासूनच तुर्विहाळ आघाडीवर होते. निजदने येथे उमेदवार दिला नव्हता. येथे 8 उमेदवार रिंगणात होते. नोटाला तिसऱया क्रमांकाची म्हणजेच 1,075 मते पडली आहेत.
2008, 2013 आणि 2018 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतापगौडा यांनीच मस्की मतदारसंघात वरचष्मा राखला होता. 2008 मध्ये ते भाजपमधून तर 2013 आणि 2018 मध्ये काँगेसमधून विजयी झाले होते. मात्र, राज्यातील नाटय़मध्य घडामोडीनंतर त्यांनी आमदारपदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. पोटनिवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट दिल्यामुळे बसवनगौडा तुर्विहाळ नाराज होते. त्यामुळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पोटनिवडणूक लढवली. आणि त्यात ते यशस्वीही ठरले.
येडियुराप्पांना धक्का भाजपला सत्तेवर आणण्यासाठी आमदारकीचा त्याग करून प्रतापगौडा पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, मतदारांनी भाजप नेत्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. येथील पराभवामुळे येडियुराप्पा यांची काही प्रमाणात पिछेहाट झाली आहे.
मतविभाजनाचा परिणाम
कमी मतदान आणि मतविभाजनाचा परिणाम बेळगाव लोकसभा निवडणुकीवर झाला आहे. त्यामुळे आपल्या पक्षातील उमेदवाराच्या विजयातील अंतर कमी झाले आहे. आपली मराठी भाषिकांची पारंपरिक मते म. ए. समितीमुळे विभागून गेली आहेत. आगामी दिवसात ही तूट भरून काढण्यात येईल. अत्यंत तटीतटीच्या लढतीत देखील बेळगावच्या जनतेने आपला हात धरला आहे. हा लोकांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा पुरावा आहे.
– प्रल्हाद जोशी, केंद्रीयमंत्री
देश मोदी, भाजपच्या बाजूने
देश नरेंद्र मोदी आणि भाजपच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच राज्यांमधील निवडणुकीत भाजपने असाधारण कामगिरी केली आहे. पुदुच्चेरीमध्ये पक्षाने इतिहास रचून प्रथमच सत्ता हस्तगत केली आहे. पश्चिम बंगालमध्येही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये पक्षाने मोठय़ा प्रमाणात मते मिळविली आहेत. आगामी दिवसांत या राज्यांमध्ये भाजप सत्तेवर येऊन नवा इतिहास रचणार आहे. कर्नाटकातही पक्षाने उत्तम कामगिरी केली आहे.
– नलिनकुमार कटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
भाजपच्या अवनतीचे पर्व सुरू
देशात भाजपच्या अवनतीचे पर्व सुरू झाले आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये पैसे व अधिकाराचा वापर करून बळ वाढविले तरी विजयाच्या जवळपास जाणे जमलेले नाही. निवडणूक जिंकण्याच्या हट्टापायी कोरोना संसर्गाचा धोका दुर्लक्षित करून आणि निवडणूक आयोगावर दबाव आणून तेथील निवडणूक घोषित केली होती. आता पराभवाबरोबरच कोरोनामुळे प्राण गमावलेल्या निष्पापांच्या मृत्यूची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना स्वीकारावी.
– सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री
पक्षाचे अस्तित्व कायम
बसवकल्याणमध्ये निजद पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी पक्षासाठी कार्यकर्ते, नेत्यांनी घेतलेले परिश्रम व्यर्थ गेलेले नाही. राष्ट्रीय पक्षांकडून अपप्रचार आणि पैशांचा गैरवापर झाल्यामुळे आपल्या उमेदवाराचा विजय हिरावला गेला आहे. पण, पक्षाचे अस्तित्व कायम आहे. राष्ट्रीय पक्षांविरुद्ध लढण्यासाठी निजद पक्ष सक्षम असल्याचा संदेश कार्यकर्त्यांनी दिला आहे. देशातील जनता राष्ट्रीय पक्षांना दूर करून प्रादेशिक पक्षातील नेत्यांचा हात धरत असल्याचे स्पष्ट आहे.
– कुमारस्वामी, निजद नेते