नवी दिल्ली, लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सुरू असलेला ‘प्रचाराचा सत्तासंघर्ष’ शनिवारी समाप्त झाला. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या रणसंग्रामात मतदानाचा फक्त एक टप्पा शिल्लक आहे. त्यासाठी शनिवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. सोमवार, 7 मार्चला याठिकाणी मतदान होणार आहे. अखेरच्या काही तासांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षाचे नेते पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले होते. पंतप्रधान गेल्या दोन दिवसांपासून काशीत तळ ठोकून होते. शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी वाराणसीत रोड शो केला. तर शनिवारी त्यांनी वाराणसीमध्ये मोठय़ा जमसभेला संबोधित केले. पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये जमलेल्या गर्दीमुळे भाजप नेते खूपच उत्साहित दिसत होते.
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सातव्या अर्थात शेवटच्या टप्प्यातील 54 जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांपैकी महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे सहा टप्पे पार पडले आहेत. आता केवळ एकाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया बाकी राहिली आहे. गेल्या महिनाभरापासून निवडणुकांची रणधुमाळी टिपेला पोहोचली होती. हा प्रचाराचा आखाडा शनिवारी अखेर संपला. यादरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यग्र होते. गृहमंत्री अमित शाह यांनी जौनपूरमध्ये रॅलीला संबोधित केले. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भदोहीमध्ये प्रचारसभा घेतली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोनभद्र, भदोही आणि आझमगडमध्ये जाहीर सभांना उपस्थिती दर्शवली. त्यानंतर त्यांनी लखनौ येथे पत्रकार परिषद घेत राज्यातील सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे आझमगढ, मिर्झापूर आणि जौनपूरमध्येही सभा घेतल्या. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक चर्चाही केली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि अनुराग ठाकूरसुद्धा प्रचारात सक्रीयपणे दिसून आले.
मोदींनी घेतला चहाचा आस्वाद
रोड शोदरम्यान एका चहाच्या स्टॉलला भेट देऊन पंतप्रधानांनी चहाचा आस्वाद घेतला. वाराणसीमध्ये आपला रोड शो संपवताना पंतप्रधानांनी विजयाचे संकेत दिले. बनारस हिंदू विद्यापीठातील पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळय़ालाही त्यांनी पुष्पहार अर्पण केला. विशेष म्हणजे पीएम मोदींच्या रोड शोमध्ये मुस्लीम समाजातील लोकही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.