नेते झाले भावूक, एकमेकांचा घेतला निरोप
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्षीय सरकारचे अखेरचे विधानसभा अधिवेशन खेळीमेळीने संपुष्टात आले. सर्व आमदार, मंत्र्यांनी एकमेकांचा निरोप घेत राष्ट्रगीताने अधिवेशनाचा समारोप झाला. सभापती राजेश पाटणेकर यांनी निवडणुकीपूर्वीचे अखेरचे अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा केली. समारोपाच्या भाषणात त्यांनी विविध मुद्यांना स्पर्श केला. सर्वांच्या सहकार्याने विधानसभा अधिवेशनाचे कामकाज हाताळले. कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. सभागृहात कोणाला जर काही बोललो असेन तर कोणी वाईट वाटून घेऊ नये, असे पाटणेकर यांनी भावूक होऊन सांगून सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
गोवा राज्य कोरोनामुक्त व्हावे : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही राज्य विधानसभेत समारोपाचे भाषण केले. ते म्हणाले की, गेवा राज्य कोरोनामुक्त आणि स्वयंपूर्ण व्हावे अशी इच्छा आहे. सभापती म्हणून दोन वर्षे तर मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षे काम केले. सर्वांच्या सहकार्याने या पदावर पोहोचलो. यावेळी स्व. मनोहर पर्रीकर यांची आठवण आल्याचे त्यांनी सद्गदीत होऊन सांगितले.
राज्याची धुरा सांभाळताना कोरोना, वादळ, पूर अशी अनेक संकटे आली. सर्व संबंधितांच्या सहकार्याने त्या संकटातून निभावले. कोरोना संकटातून मार्ग काढताना मोठय़ा संख्येने कोरोनायोद्धयांनी साथ दिली. गोव्याचा विकास हेच ध्येय ठेवून तो नेला. त्यासाठी विधानसभेत व बाहेरही सत्ताधारी-विरोधी पक्षाच्या सर्व आमदार मंत्री यांचे सहकार्य लाभले म्हणून डॉ. सावंत यांनी कृतज्ञता प्रकट केली. केंद्राच्या सहकार्याने गोव्यात विकासकामे केली. निवडणुकीत विजयी केले म्हणून सांखळीतील लोकांचे त्यांनी आभार मानले.
पुढील विधानसभेत प्रतापसिंह राणे राष्ट्रीय विक्रम करतील : कामत
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी देखील आपल्या भावना विरोधकांच्यावतीने प्रकट केल्या. विरोधी पक्ष म्हणजेच जनतेचा आवाज आणि तो उठवणे हेच आमचे कर्तव्य आहे. ते करताना कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता, असा खुलासा कामत यांनी केला. पुढील विधानसभेत प्रतापसिंह राणे असतील आणि ते सलग 50 वर्षीय आमदारकीचा राष्ट्रीय विक्रम करतील, अशी सदिच्छा कामत यांनी वर्तविली.