मंत्री ईश्वरप्पांच्या विधानावरून हंगामा ः राष्ट्रध्वज अवमानाच्या मुद्दय़ावर काँग्रेसचे आमदार आक्रमक
प्रतिनिधी/ बेंगळूर
दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकविण्यात येईल, असे विधान ग्रामविकासमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी मागील आठवडय़ात केले होते. या विधानाचे बुधवारी विधानसभेत पडसाद उमटले. ईश्वरप्पा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करून काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत धरणे आंदोलन केले. यावेळी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये हातघाई होण्याची स्थिती निर्माण झाल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ माजला. त्यामुळे सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी कामकाज एक दिवसासाठी तहकूब केले.
हिजाब-भगव्या स्कार्फवरून राज्यात गोंधळ माजलेला असतानाच मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा फडकविण्यात येईल, असे विधान केले होते. बुधवारी या विधानावरून विधानसभेत हंगामा झाला. प्रश्नोत्तर चर्चेचा कालावधी संपल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना लक्षवेधी सूचनेंतर्गत विषय मांडण्याची मुभा दिली. यावेळी सिद्धरामय्या यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान करणे देशद्रोहाशी समांतर आहे. त्यामुळे ईश्वरप्पा यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.
त्यावेळी आमदार सी. टी. रवी यांनी, काश्मीरमध्ये जनतेच्या हाती बंदुका देऊन काँग्रेसने देशद्रोह केला आहे, अशी टीका केली. त्यामुळे सिद्धरामय्या आणि सी. टी. रवी यांच्यात शाब्दिक जुंपली. त्याचवेळी सभाध्यक्षांनी ईश्वरप्पा यांना बोलण्याची संधी दिल्याने काँग्रेसचे आमदार आणखी संतप्त झाले. ईश्वरप्पा यांनी उभे राहून बोलण्यास प्रारंभ करताच काँग्रेसचे आमदार डी. के. शिवकुमार यांनी त्यांना देशद्रोही असे संबोधले. परिणामी ईश्वरप्पाही संतापले. त्यांनीही शिवकुमारांवर एकेरी शब्दात हल्लाबोल केला. ‘कारागृहात जाऊन आलेल्या तुझ्यासारख्या व्यक्तीकडून मी धडा घेण्याची गरज नाही,’ असे परखड बोल ईश्वरप्पांनी शिवकुमारांना सुनावले.
शिवकुमार-ईश्वरप्पा आमनेसामने
बोचरी टीका शिवकुमारांच्या वर्मी बसल्याने त्यांनी ईश्वरप्पांवरही एकेरी शब्दात हिणविण्यास सुरूवात केली. तसेच ईश्वरप्पा यांना बोलण्यास देऊ नका, अशी मागणी करत शिवकुमार विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्याजवळ आले. त्यामुळे कुर्त्याच्या बाहय़ा वर करत ईश्वरप्पा भांडणाऱया पवित्र्यात पुढे आले. प्रत्युत्तरदाखल शिवकुमार यांनीही प्रतिआव्हान दिले. परिणामी सभागृहात गोंधळ माजला. त्यावेळी सभाध्यक्ष कागेरींनी शिवकुमारांना तुम्ही कोठे आहात, याचे भान आहे का?, असा प्रश्न केला.
दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनी ईश्वरप्पांच्या आसनासमोरील भागात धाव घेऊन घोषणाबाजी केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये हातघाई होण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी विधानसभेचे कामकाज दुपारी 3 पर्यंत पुढे ढकलले आणि ते सभागृहाबाहेर गेले. त्यानंतर काँग्रेस आमदारांनी अचानक ईश्वरप्पांच्या दिशेने धाव घेऊन हुज्जत घातली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे निदर्शनास येताच मार्शलांनी हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा काँग्रेस सदस्यांचा संताप कमी झाला नाही. त्यांनी सत्ताधारी पक्षावर टिकेची झोड उठविली. त्यामुळे सभागृहात उपस्थित असलेले सर्व मंत्री ईश्वरप्पांच्या समर्थनार्थ उभे राहिले. यावेळी काँग्रेसचे आमदार घोषणाबाजी करत सभागृहाबाहेर पडले.
ईश्वरप्पांच्या अटकेची मागणी
भोजनानंतर दुपारी 3 वाजता पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या आमदारांनी राष्ट्रध्वज हाती धरून सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी सिद्धरामय्या म्हणाले, ईश्वरप्पांनी शिवकुमारांच्या घरच्यांविषयी अपशब्द वापरले आहेत. हा अक्षम्य अपराध आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱया ईश्वरप्पांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.
त्याचवेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, सभागृहात राष्ट्रध्वज घेऊन आंदोलन करणे योग्य नव्हे. हे ध्वजसंहितेचे उल्लंघन आहे. राष्ट्रध्वज कोठे व कसा वापरावा, याबाबत नियम आहेत. ‘’तुम्ही हुबळीतील इदगाह मैदानावर तीन वर्षे राष्ट्रध्वज फडकवू दिला नाही. काँग्रेसचे सरकार गेल्यानंतर तेथे राष्ट्रध्वज फडकवावा लागला. राजकीय हेतूपुरस्सर राष्ट्रध्वज वापरत आहात काय?’’, असा प्रश्न बोम्माईंनी काँग्रेसच्या आमदारांना केला. त्याचवेळी बोम्माईंचे समर्थन करताना सभाध्यक्षांनी आंदोलनासाठी “राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, हा काय तुमच्या पक्षाचा ध्वज आहे का?’’, अशी विचारणा करत तुम्ही करत आहात ते योग्य नाही, असे सुनावले. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे सभाध्यक्षांनी गदारोळातच विधानसभेचे कामकाज गुरुवारी सकाळपर्यंत पुढे ढकलले.
विधानपरिषदेचेही कामकाज एक दिवस लांबणीवर
विधानपरिषदेत काँग्रेसच्या सदस्यांनी याच मुद्दय़ावर लक्षवेधी सूचना मांडण्याची विनंती केली. मात्र, सभापती बसवराज होरट्टी यांनी नकार दर्शवून रुलिंग दिले. सभापतींच्या रुलिंगला विरोध दर्शवून चर्चेसाठी मुभा द्यावी, अशी मागणी करून काँग्रेसच्या सदस्यांनी सकाळपासून विधानपरिषदेत धरणे आंदोलन हाती घेतले. एकदा कामकाज लांबणीवर टाकण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर देखील काँग्रेसचे सदस्य आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने या सभागृहाचे कामकाजही दुपारनंतर एक दिवसासाठी तहकूब करण्यात आले.
…अन्यथा अधिवेशनावर बहिष्कार ः सिद्धरामय्या
गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत के. एस. ईश्वरप्पा यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा. तसेच राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी त्यांच्याविरोधात देशदोहाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळ अधिवेशनावर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली आहे.