निवडणुका होणार की नाही याचे चित्र होईल स्पष्ट, निवडणुकांवर कोरोनाचे सावट
राज्यातेल सात जागांची मुदत संपणार डिसेंबरमध्ये
प्रवीण देसाई / कोल्हापूर
राज्यातील विधान परिषदेच्या सात जागांची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. अद्यापही राज्यावर कोरोना महामारीचे संकट कायम आहे. त्यामुळे या निवडणुकाही कोरोनाच्या सावटाखाली सापडल्या आहेत. या निवडणुका होणार की नाही याचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली तरच या निवडणूका होऊ शकतात. अन्यथा पुढे काय करायचे ? हा निर्णय निवडणूक आयोगाकडूनच घेतला जाणार आहे.
सहा वर्षांपूर्वी 27 डिसेंबर 2015 ला राज्यातील सात विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक झाली होती. यामध्ये मुंबईच्या दोन जागा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, धुळे,अकोला-वाशिम-बुलढाणा येथील प्रत्येकी एक अशा सात जागांवरील उमेदवार विजयी झाले होते. काँग्रेस, शिवसेना, भाजप या राजकीय पक्षांसह पुरस्कृत उमेदवारांचा यामध्ये समावेश होता. या सातही जागांची मुदत या डिसेंबर 2021 अखेर संपणार आहे. त्यामुळे या निवडणुकांबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने बहुतांश निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. येत्या काही महिन्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधान परिषद निवडणूक प्रक्रिया ही भारत निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येते. राज्यातील सात जागांची मुदत डिसेंबरअखेर संपत आहे. त्यामुळे त्याची प्रक्रिया ऑक्टोबरपासून सुरु करावी लागणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाकडून राज्यातील कोरोनास्थितीबाबत राज्य सरकारकडून म्हणणे घेतले जाईल. तत्कालिन परिस्थिती पाहूनच या निवडणूका घ्यायच्या कि नाही याचा निर्णय आयोगाकडून घेतला जाऊ शकतो.
स्थानिक स्वराज संस्थेची कोणतीही निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक यासाठी हजारो व लाखो मतदार आपला हक्क बजावतात. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराची भीती असते. पश्चिम बंगालसह इतर राज्यातील निवडणुकांमुळे हे अधोरेखित ही झाले आहे. त्याबाबत न्यायालयाने निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे कोणतीही निवडणूक घेताना आयोगाकडून सर्व बाजूंचा विचार केला जाणार आहे. विधान परिषदेसाठी मर्यादीत म्हणजे शेकड्याच्या घरातच मतदान असते. त्यामुळे कोरोना प्रसाराची भिती थोडी कमी असते. परंतु निवडणूक म्हटली की प्रचार आणि सभा, मेळावे आलेच, त्यामुळे या निवडणुका घ्यायची जोखीम आयोग पत्करणार काय ? हा प्रश्न आहे. यामुळे निवडणूका होणार की नाही ? याचा फैसला ऑक्टोबर महिन्यातच होईल, असे चित्र आहे.
गत विधान परिषद निवडणुकीचा आढावा
मतदान दिनांक : 27 डिसेंबर 2015
मतदान निकाल : 30 डिसेंबर 2015
कोल्हापूर विधान परिषदेसाठी झालेले मतदान (2015)
एकूण मतदान : 382
जिल्हा परिषद सदस्य : 81
कोल्हापूर महापालिका नगरसेवक : 81
सर्व नगरपालिका नगरसेवक : 220
विधान परिषदेचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील
मुंबई : आमदार रामदास कदम, आमदार भाई जगताप
सोलापूर : आमदार प्रशांत परिचारक
अहमदनगर : अरुण जगताप
धुळे : अमरिष पटेल
अकोला-वाशिम-बुलढाणा : गोपीकिशन बजोरीया