प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यात महाविकास आघाडीच्या विरोधात वर्षभर टीका करत असताना विधान परिषद निवडणुकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सोबत गेले आहेत. आज कोल्हापूर विधान परिषदेचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावून त्यांनी महाविकास आघाडी सोबत असल्याचे जाहीर केले. मात्र महापूर काळात झालेल्या मदतीवरून त्यांनी मेळाव्यात आपली खंत व्यक्त केली.
महाविकास आघाडीच्या मेळाव्यात राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त करत पूरग्रस्त निधीवरून नागरिक नाराज आहेत. याची दखल घ्यावी, असे आवाहन केले. राजू शेट्टी यांनी भर सभेत उपस्थित मंत्र्यांना टोला लगवल्याने सर्वत्र हशा पिकला. मात्र एकीकडून वर्षभर राज्य सरकारच्या विरोधात रान उठवून पाठिंबा दिल्याने अनेकांनी त्यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली. राजू शेट्टी पुढे म्हणाले, महापुराची नुकसान भरपाई तोकडी आहे. मात्र हीच वेळ आहे. तुम्हाला सांगण्याची आणि तुम्ही ऐकून घेण्याची. त्यामुळे मंत्र्यांनी ऐकून घ्यावे. असे वक्तव्य केले.