सात दिवस चालणार कामकाज
प्रतिनिधी/ बेंगळूर
सत्ताधारी भाजपमधील अस्वस्थता, मंत्र्यांमधील असमाधान दूर करण्यासाठी चार वेळा केलेले खातेबदल यांचे भांडवल करून गुरुवारपासून होणाऱया विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. गुरुवारपासून 7 दिवस बेंगळूरमधील विधानसौधमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. अनेक विधेयके या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे विधानपरिषदेत सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव मांडून नवा सभापती नेमण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य भाजपमध्ये असमाधानाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाची बाजू सांभाळणे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. एपीएमसी कायद्यातील दुरुस्ती, विधानपरिषद उपसभापती एस. एल. धर्मेगौडा यांची आत्महत्या, शिमोगा जिल्हय़ातील क्वारीतील स्फोट, सरकारविरोधात शेतकऱयांचे सुरू असणारे आंदोलन, केपीएससीतील प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण, कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकारचे दुर्लक्ष आदी मुद्यांवरून सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षांनी तयारी केली आहे.
गुरुवारी सकाळी 11 वाजता विधिमंडळ अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. सुरुवातीला राज्यपाल वजुभाई वाला अभिभाषण करतील. त्यानंतर अलीकडेच निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज शुक्रवारपर्यंत लांबणीवर टाकण्यात येईल. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून कामकाजाला प्रारंभ होईल. अधिवेशनाच्या प्रारंभीच सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे धर्मेगौडा यांच्या मृत्यूमुळे रिक्त असणाऱया उपसभापतीपदासाठी शुक्रवारीच निवडणूक होणार आहे.
5 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱया या अधिवेशनात भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेल्या निजदचीही कोंडी करण्यासाठी काँग्रेस आमदारांकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात एकूण 11 विधेयके मांडण्यात येणार आहेत बागायत, मोटार वाहन दुरुस्ती विधेयक, लोकायुक्त कायद्यातील तिसरे दुरुस्ती विधेयक, एट्रीया विद्यापीठ, विद्याशिल्प विद्यापीठ विधेयक आदी विधेयकांचा यामध्ये समावेश आहे.