हिजाब आणि केशरी स्कार्फवरून जोरदार वादावादी होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
हिजाब आणि केशरी स्कार्फवरून राज्यात तणाव निर्माण झालेला असतानाच सोमवार दि. 14 फेबुवारीपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादावादी होण्याची शक्यता आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत सोमवारी सकाळी 11 वाजता विधानसभेच्या सभागृहात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना उद्देशून संबोधित करणार आहेत. मंगळवारी राज्यपालांच्या भाषणाला अनुमोदन देण्याचा ठराव मांडण्यात येणार असून भाषणावरील चर्चेला चालना मिळणार आहे. हे अधिवेशन 14 ते 25 फेबुवारीपर्यंत होणार आहे.
अपेक्षेप्रमाणे अधिवेशनात सध्या राज्यभरात प्रचंड संघर्ष निर्माण करणाऱया हिजाब आणि केशरी स्कार्फचा विषय प्रस्तावित होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबत उल्लेख केला असून भाजपसह संघ परिवाराविरोधात आरोप केला आहे. आता सभागृहातही तोच विषय मांडण्यासाठी तयारी सुरू केली असून याबाबत माहिती जाणून घेत असल्याचे समजते. याचबरोबर भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या विरुद्ध आंदोलन छेडण्यासाठी विरोध पक्ष सज्ज झाले असून विरोधकांना उत्तरे देण्याची सर्वतयारी सत्ताधारी भाजपने केली आहे. एकूण 10 दिवस होणाऱया अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. यंदाच्या अधिवेशनात भाजपला संकटात टाकण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. तसेच सोमवारी सायंकाळी 6 वाजता काँग्रेसने विधिमंडळाची बैठक बोलाविली आहे. काँग्रेस आणि निजदच्या आरोपांना कागदपत्रांसह उत्तर देण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. अधिवेशनात अनेक विषयांवर जोरदार चर्चा होणार असून काही महत्त्वाची विधेयके मंजूर होणार आहेत.