राज्याच्या इतिहासात प्रथमच प्रकार घडण्याची शक्यता
प्रतिनिधी /पणजी
राज्याच्या इतिहासात प्रथमच विधिमंडळ नेता नसताना नव्या विधानसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा आमदारपदी शपथविधी होण्याचा मजेशीर प्रकार पहावयास मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.
दि. 16 रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी आज दि. 14 रोजी हंगामी सभापतीचा शपथविधी आणि उद्या दि. 15 रोजी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा अधिवेशन बोलावून आमदारांचा शपथविधी होणार आहे.
दि. 16 पर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात न आल्यास घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊन राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू होऊ शकते. हा पंचप्रसंग टाळण्यासाठीच ही क्लुप्ती लढवून तांत्रिक पळवाट शोधण्यात आली असल्याचे समजते.
भाजप पक्षश्रेष्ठींकडे गोव्यासाठी वेळ नाही
देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ पंजाब वगळता अन्य सर्व राज्यात भाजपने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे भाजपचे श्रेष्ठी अत्यंत व्यस्त आहेत. त्यातून गोव्याकडे खास लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याने अद्याप पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीचे निरीक्षक गोव्यात दाखल झालेले नाहीत. परिणामी विधीमंडळ नेता निवड लांबणीवर पडली आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार
भाजपात कधी नव्हे ती मुख्यमंत्रीपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यापूर्वी असे प्रकार काँग्रेस पक्षात घडत होते. ’मुख्यमंत्री कुणाला करावे?’ हे कोडे सोडविण्याच्या प्रयत्नात यापूर्वी काँग्रेसला तोंडाशी आलेली सत्ता गमवावी लागली होती. तसाच प्रकार आता भाजपात दिसून येत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार निर्माण झाल्यामुळे त्यांची नेता निवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे भाजपात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येण्याचा अवधी उंबरठय़ावर पोहोचला आहे. त्याला वेळीच न रोखल्यास घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊन राज्य राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने जाऊ शकते. यावर तोडगा म्हणून नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी उरकून काळजीवाहू सरकार स्थापन झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे समजते.
आजपर्यंतच्या प्रथेनुसार आधी मंत्रीमंडळ स्थापन करून आमदारांचा शपथविधी होत होता. त्यानंतर विधानसभा अधिवेशन होत होते. 1987 मध्ये गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला. त्यानंतर 1989 मध्ये झालेल्या विधानसभा अधिवेशनापासून हीच प्रथा कायम होती. यंदा प्रथमच त्यात खंड पडणार अशी स्थिती आहे. कारण, नाही म्हटले तरी विधानसभा कार्यकाळ संपण्यास अद्याप दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे दोन दिवसात सरकार स्थापनही होऊ शकते. परंतु आधी शपथविधी आणि नंतर मंत्रीमंडळ स्थापन होण्याचा प्रकार प्रथमच पहावयास मिळणार आहे.
सभापतीपदी रमेश तवडकर
सुभाष शिरोडकर यांना सभापतीपद देण्यावर सर्वांचे एकमत झाले असले तरी स्वतः शिरोडकर यांनी मात्र त्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. त्याबदल्यात त्यांनी मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांची सभापतीपदी वर्णी लावण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
विधानसभेचे उद्या विशेष अधिवेशन नवनिर्वाचित आमदारांचा होणार शपथविधी
हंगामी सभापतीपदी गणेश गावकर
विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी उद्या दि. 15 रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार आहे.
सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नवनिर्वाचित आमदारांना ते शपथ देणार आहेत. तत्पूर्वी आज दि. 14 रोजी राज्यपाल श्री. पिल्लई हे आमदार गावकर यांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. हा सोहळा सकाळी 11.30 वाजता राजभवनवर होणार आहे. विधानसभा विशेष अधिवेशन उद्या दि. 15 रोजी सकाळी 11.30 वाजता प्रारंभ होणार आहे.
विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ दि. 15 रोजी संपुष्टात येत असल्याने निर्वाचन आयोगाने दि. 10 मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यपाल श्री. पिल्लई यांनी दि. 12 रोजी विधानसभा विसर्जित केली आहे. तत्पूर्वी दुपारीच डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला. राज्यपालांनी तो तत्काळ मंजूर करताना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून डॉ. सावंत यांचीच नियुक्ती करून तसे पत्र त्यांना सुपूर्द केले आहे.