प्रतिनिधी / रत्नागिरी
लॉकडाऊन च्या काळात अनेक गरजू लोकांचे हाल होऊ नये यासाठी गेले महिनाभर रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून शासकीय व अशासकीय व्यक्ती व संस्थांमार्फत मदत पुरवले जात आहे. इतकेच नव्हे तर खऱ्या अर्थाने मदत पोहचते की नाही याचा पाठपुरावा देखील विधी सेवा करत असून आज रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो निराधार, होतकरूंना मदत प्राप्त झाली आहे.
सध्या आपल्या भारत देशामध्ये कोरोना साथ पसरली असून नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. तसेच भारत सरकारने संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन जाहीर केलेले आहे. अशा परिस्थितीत रत्नागिरी जिल्हयामध्ये लॉकडाउन मुळे प्रभावित झालेले बेघर, स्थलांतरीत कामगार आणि गोरगरीब यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि गरजू लोकांना अन्नधान्य पुरवठा करणे आवश्यक होते. जरी स्थानिक लोकांना वेगवेगळया अशासकीय संस्थांमार्फत मदत केली जात असली तरी कोकणातील दुर्गम भागातील लोकांपर्यंत त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि प्रत्यक्ष मदत पोहोचवणे ही महत्वाची बाब होती. त्यासाठी विधी सेवा प्राधिकरणातर्फे संपूर्ण जिल्हाभर एकही गरीब अथवा गरजू अन्नधान्याविना उपाशी राहणार नाही यासाठी सर्वोच्च न्यायालयाची आपत्ती पिडीतांसाठी विधी सेवा आणि शासकीय योजनांची योग्य अंमलबजावणी गरजूंपर्यंत पोहोचवणे यासाठी उपक्रम राबविला आहे.
त्यासाठी तालुक्यातील न्यायाधीश आणि कायदासाथी शासकीय यंत्रणेला सहकार्य करत गरजू लोकांना ओळखून शासकीय योजना अंतर्गत अन्नधान्य वितरण, अशासकीय संस्थांच्या मदतीने अन्नधान्य वितरण आणि मदतकार्य गरजू लोकांना केले जात आहे. विधी विदयार्थी आणि सामाजिक भान ठेवून पुढे आलेले वकील यात सहभागी आहेत. रत्नागिरी तालुक्यामध्ये पांडूरंग लक्ष्मण नंदीवाले, अरूण तुकाराम मौर्य, संकेत सुरेश नवले, अयुधा अक्षय देसाई, अभिलाष अतुल पिलणकर, अमित अजित वायकूळ, अथर्व संजेश देसाई, नितीराज विजय शिर्के, सिध्देश सुहास रानडे, पूर्वा मनोज जोगळेकर, श्रृती सुदेश मायनाक, दापोली तालुक्यामध्ये संदेश मोरे, सोनल तेंडूलकर, लांजा तालुक्यात एम.एम. बंडबे, स्वप्ना सावंत, वृषाली कुरूप, योगेश सावंत, चिपळूण तालुक्यात सिध्दी शिंदे, देवरूख तालुक्यात यु.पी. चव्हाण, व्ही. एस. कुलकर्णी, व्ही. एस. मुरूडकर, सुरेंद्र गांगण, गुहागर तालुक्यात अलंकार विखारे आणि संदीप पवार, खेड तालुक्यात यश घोसाळकर हे सर्व कायदासाथी गोरगरीब लोक ज्यांना अन्नधान्य पुरवठा झालेला नाही त्यांची तक्रार विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडे सादर करत आहेत.
प्राप्त झालेली तक्रार ही रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडे सादर केली जाते. त्याचप्रमाणे स्वत: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सहाय्यक धर्मादाय आयुक्त डी. एम. जी. मलिदवाले यांच्या मदतीने आणि सहकार्यातून वेगवेगळया धर्मादाय संस्था आणि अशासकीय संस्था मार्फत विधी सेवा प्राधिकरणाला अन्नधान्य कीट्सचा पुरवठा करत आहेत. आज आतापर्यंत दुर्गम हजारो लोकांना तशी प्रत्यक्ष मदत विधी सेवा प्राधिकरणतर्फे देण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुख्यत्वेकरून गोरगरीब, खाणी मध्ये काम करणारे लोक आणि झोपडपट्टीतील लोक यांना १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये तांदूळ, आटा, चहापावडर, साबण, साखर, टुथपेस्ट, तेल, मसाला, डाळ, हळद, कांदा, बटाटा इत्यादी यासारखे साहित्य जसे जसे धर्मादाय संस्थांनी पुरवठा केला तसा पुरवठा लोकांपर्यंत स्वत: कायदासाथी यांनी स्वत: मेहनत घेउन लोकांच्या तकारीचे निवारण केले आहे. त्यामुळे विधी सेवा प्राधिकरणामार्फत शासनातर्फे पुरविल्या जाणा-या योजना यांच्याशी समन्वय साधून एकात्मिक आणि शाश्वत स्वरूपात कृती करून लॉकडाउनमुळे निर्माण झालेली गरीब व गरजू लोकांची आणि मजूरांची समस्या याची शीघ्रता कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे.
कायदासाथी, शासकीय यंत्रणा गरीब व गरजू लोक कोण आहेत हे निश्चित करून त्यांना कोणता अन्नधान्य पुरवठा करणे आवश्यक आहे. अथवा अपूरा झाला आहे किंवा आवश्यक आहे याचा सविस्तर अहवाल विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडे सादर करत आहेत. त्यानंतर पूर्तता झाल्याचा अहवालही सादर करत आहेत. त्यामुळे ख-या गरजवंतांना विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपत्ती पिडीतांना मिळत आहे आणि सार्वजनिक वितरण प्रणालीवर देखरेख ठेवली जात आहे.