चिल्लूपार मतदारसंघ ः योगी विरोधी हरिशंकर तिवारींचे पुत्र
उत्तरप्रदेशात 6 व्या टप्प्यातील निवडणुकीत सर्वांच्या नजरा गोरखपूरच्या चिल्लूपार मतदारसंघावर असणार आहेत. पूर्वांचलमधील ब्राह्मणांचे मातब्बर नेते हरिशंकर तिवारी यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो. 1985-2007 पर्यंत हरिशंकर तिवारी यांचे येथे वर्चस्व राहिले आणि आता त्यांचे पुत्र विनयशंकर तिवारी आमदार आहेत. योगी आदित्यनाथ आणि हरिशंकर तिवारी यांच्यातील राजकीय संघर्षामुळे चिल्लूपार मतदारसंघात यश मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, तर तिवारी परिवार स्वतःचा राजकीय प्रभाव कायम करण्यासाठी धडपड करत आहे.
चिल्लूपारमध्ये यंदा तीन ब्राह्मण नेत्यांदरम्यान राजकीय युद्ध होतेय. हरिशंकर तिवारींचे पुत्र विनयशंकर हे बसपच्या हत्तीवरून उतरत समाजवादी पक्षाच्या सायकलवर स्वार होत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर भाजपकडून माजी मंत्री राजेश त्रिपाठी, काँग्रेसकडून सोनिया शुक्ला आणि बसपच्या वतीने राजेंद्रसिंह पहलवान निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत तीन ब्राह्मण नेत्यांच्या लढाईत बसपकडून उभे राहिलेल्या ठाकूर समुदायाचे राजेंद्र सिंह यांनी लढत अधिकच चुरशीची केली आहे.
चिल्लूपार मतदारसंघात भाजप, सप, काँग्रेस, बसपचे उमेदवार मजबुतीने निवडणूक लढवत आले आहेत. यापूर्वी येथे मुख्य लढाईत बसप आघाडीवर असायचा. सप आणि भाजप दुसऱया किंवा तिसऱया स्थानावर असायचे. परंतु यंदा असे चित्र नाही, ब्राह्मण मते विभागली जाणार असल्याने चिल्लूपारची लढाई अधिकच रंगतदार ठरली आहे. हरिशंकर तिवारी 22 वर्षे आमदार राहिले, पक्ष कुठलाही असो ते हमखास निवडून येत होते.
2007 च्या विधानसभा निवडणुकीपासून या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली. बसप दलित मतपेढीच्या बळावर येथील राजकारणात प्रभावशाली ठरला. दिग्गज हरिशंकर तिवारी हे राजकारणात नवखा असलेला बसप उमेदवार राजेश त्रिपाठी यांच्याकडून पराभूत झाले. त्रिपाठी हे मायावती सरकारमध्ये मंत्री होते. 2012 च्या निवडणुकीत हरिशंकर तिवारी पुन्हा त्रिपाठी यांच्याकडून हरले होते. या पराभवानंतर हरिशंकर तिवारी यांनी राजकारणातून संन्यास घेतला होता.
पुत्राने सांभाळला राजकीय वारसा
हरिशंकर यांचे पुत्र विनयशंकर हे त्यांचा राजकीय वारसा सांभाळत आहेत. 2017 च्या निवडणुकीत विनयशंकर यांनी बसपच्या वतीने निवडणूक लढवत राजेश त्रिपाठी यांना पराभूत केले होते. यंदाही याच दोन्ही नेत्यांदरम्यान मुख्य लढत होणार आहे. परंतु विनयशंकर आता समाजवादी पक्षाच्या वतीने निवडणुकीत उतरले आहेत.
या मतदारसंघात ब्राह्मणांसह दलित समुदायांच्या मतांना जोडून बसपने येथे 2 निवडणुकांमध्ये विजय मिळविला होता. यंदाच्या निवडणुकीत सप, काँग्रेस आणि भाजपने ब्राह्मण उमेदवार दिला, तर बसपने ठाकूर समुदायाच्या नेत्याला संधी दिली आहे. सपने विनय तिवारी यांच्याद्वारे यादव, मुस्लीम आणि ब्राह्मण समुदायाला एकत्र आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर राजेश त्रिपाठी यांना उभे करून भाजप ठाकूर-ब्राह्मण समीकरण जुळवू पाहत आहे.
दलित-ब्राह्मण निर्णायक भूमिकेत
मतदारसंघात ब्राह्मण समुदायाचे प्रमाण अधिक आहे. येथे सुमारे 80 हजार ब्राह्मण मतदार आहेत. तर दलित मतदारांची संख्या 1 लाख 15 हजार आहे. ब्राह्मण 80 हजार, यादव 40 हजार, मुस्लीम 30 हजार, निषाद 25 हजार, मौर्य/कुशवाह 20 हजार, वैश्य 25 हजार, क्षत्रिय 20 हजार, भूमिहार 20 हजार मतदार आहे.