विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विनाअनुदान तत्वावर सेवा बजावणारे शिक्षक आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आहेत. सरकारने त्यांना देखील विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना पाठविले आहे.
खासगी शाळा-महाविद्यालयांमध्ये सेवा बजावणाऱया शिक्षकांनाही पॅकेजचा लाभ मिळेल, अशी आशा होती मात्र, सरकारने दुर्लक्ष केले आहे. शिक्षणमंत्र्यांनी संकटग्रस्त असणाऱया विनाअनुदान शिक्षकांच्या बाबतीत दुर्लक्ष करणे खेदाची बाब आहे. या शिक्षकांच्या बाबतीत सरकार नेहमीच दुजाभाव करीत आले आहे. कोरोना परिस्थितीचा शिक्षकांनाही फटका बसला असून कामगार वर्गाप्रमाणेच शिक्षकांनाही पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी सभापती बसवराज होरट्टी यांनी केली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे मुले शाळेला आली नाही तर पालकही शुल्क भरत नाहीत. सरकारने ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. तरी सुद्धा खासगी शाळांनी शुल्क भरण्यासाठी पालकांवर दबाव आणू नये, अशी सूचना दिली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शिक्षण संस्थांना शिक्षकांचे वेतन देणे शक्य झालेले नाही. आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने खासगी शिक्षण संस्था अडचणीत आल्या आहेत. परिणामी मार्च महिन्यापासून वेतनाविना अनेक शिक्षकांचे हाल होत आहेत. शिवाय सरकार आरटीईचे शुल्क देखील खासगी शाळांच्या खात्यात जमा करीत नाही. त्यामुळे सरकारने तातडीने खासगी शिक्षकांसाठी आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.