प्रतिनिधी / कोल्हापूर
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची आता थेट कोरोनाच् चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी संबंधित यंत्रणेला दिले. जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी जिल्ह्यात 15 दिवस निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यांवर तपासणी आणखी कडक करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपायुक्त निखिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा बंदी अजूनही कायम असल्याने जिल्ह्यात प्रवेश करताना पास घेऊनच येणे अपेक्षित आहे. पर राज्यातील व्यक्तींनाही त्याप्रमाणेच शासनाचा नियम आहे. तपासणी नाक्यावर त्या पासची तपासणी व आवश्यकतेप्रमाणे व्यक्तीची थर्मल स्कीनिंग, पल्स, ऑक्सिमीटर तपासणी केली जाईल. यामध्ये कोणाला लक्षणे आढळली तर अँटीजन टेस्ट केली जाईल, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.