नियम शिथील होताच वाहनधारक झाले बेभान
प्रतिनिधी/ सातारा
चौथ्या टप्प्यात लॉकडाऊनचे नियम आणखी शिथील करण्यात आले. खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे दिवसभर खरेदीसाठी गर्दी होत आहे. दरम्यान, काही वाहनधारक नियम मोडत असल्याने गुरूवारी अशा 25 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई अशीच सूरू राहणार असून विनाकारण फिराल तर कारवाईला सामोरे जाल असे म्हणण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली आहे.
कोरोनाच्या विळखा दिवसेंदिवस वाढत असताना लॉकडाऊनचे नियम ही शिथील करण्यात आले आहेत. एकीकडे धास्ती वाढली आहे. तर दुसरीकडे खरेदीला गर्दी होत आहे. या वाढत्या गर्दीला पाहून विक्रेत्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. मात्र, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडताना दिसत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत खरेदीला परवानगी मिळाली आहे. दरम्यान, 5 नंतरही काही विक्रेते विक्री करताना दिसत आहेत. तर खरेदीला गेलेले लोक आपल्या वेळेनुसार घरी परतत आहेत. सायंकाळी 7 नंतर शहरात दुचाकीस्वार फिरताना आढळत आहेत.
गुरूवारी मोती चौक परिसरात विनाकारण फिरणाऱया 25 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून 10 हजार 200 रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी दिली. तरीही या कारवाईची धास्ती इतर वाहनचालकांनी घेतलेली नसल्याचे चित्र दिसत आहेत. एका दुचाकीवरून एकालाच प्रवेश असा नियम आहे. मात्र प्रत्येक दुचाकीवर दोन जण स्वार होत आहेत. काही भागात वाहतूक पोलीस तैनात आहेत. या पोलीसा समोरून हे वाहनधारक जात आहेत. तरीही अद्याप अशा वाहनचालकांवर कारवाई झालेली नाही. यामुळे कारवाई कधी असा प्रश्न पोलीसांना विचारण्याची वेळ आली आहे.