बाजारपेठेत फिरणाऱयांकडे लक्ष देण्याची गरज : दहा दिवसात 1 लाखाहून अधिक दंड वसूल
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, याकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे महापालिकेकडून विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, केवळ दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत असून बाजारात विनामास्क फिरणाऱया नागरिकांवरही कारवाई करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
विनामास्क फिरणाऱयांवर मागील दहा दिवसांपासून ही कारवाई सातत्याने करण्यात येत आहे. दहा दिवसात महापालिकेच्या विशेष पथकाने 1 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. गुरुवारी सकाळपासूनच ही कारवाई राबविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. शहराच्या विविध भागात सात पथकांच्या माध्यमातून विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्यात आली. दिवसभरात 11 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला.
सकाळपासूनच ही कारवाई हाती घेण्यात आली होती. घाईगडबडीने घराबाहेर पडलेल्या नागरिकांना विनामास्क कारवाईला सामोरे जावे लागल्याने दंड भरण्याची वेळ आली. बाजारपेठेतदेखील ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईअंतर्गत केवळ दुचाकी वाहनधारकांना अडवून दंड वसूल करण्यात येत आहे. पण बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. काही व्यावसायिक मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी विनामास्क ये-जा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे विनामास्क कारवाईवेळी केवळ वाहनधारकांना लक्ष्य न करता अन्य नागरिकांनाही मास्कची सक्ती करावी, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.