प्रतिनिधी /निपाणी :
निपाणी शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही नागरिक, वाहनधारक मात्र बिनधास्तपणे विनामास्क वावरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पालिकेने विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई सुरू केली होती. मात्र, ही कारवाई थंडावल्याने विनामास्क फिरणाऱयांची संख्या वाढल्याचे दुर्दैवी चित्र शहरात दिसून येत आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची शासकीय आकडेवारी 600 वर पोहोचली आहे. संसर्गाचा फैलाव वाढतच चालल्याने शहरातील ठराविक भाग हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी सुरक्षित नियमावलींचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी असताना त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करत आहेत. संसर्गाला अटकाव घालण्यासाठी केंद्र सरकारने मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क नसणाऱयांवर कारवाईचा अधिकार प्रशासनाला आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी शहरात नगरपालिकेने मास्क न वापरणाऱयांवर कारवाई केली होती.
त्यामुळे दंड टाळण्यासाठी का होईना मास्क वापरला जात होता. मात्र, आता अनेकजण विनामास्क फिरत आहेत. तसेच जुना पी. बी. रोडवरील अनेक फिरते व्यापारी, हातगाडीवाले हे मास्कचा वापर न करताच आपला व्यवसाय करत आहेत. याशिवाय बसमधून प्रवास करणारेही अनेकजण विनामास्क दिसून येत आहेत. याचा परिणाम म्हणून कोरोनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे पालिकेसह पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मास्कचा वापर न करणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी सूज्ञ नागरिकांतून होत आहे.