19 लाख 25 रुपये दंडाची वसुली – राज्यभरात पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ पणजी
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकार हरप्रकारे प्रयत्न करीत असून सरकारने घालून दिलेल्या प्रतिबंधक नियमांचे पालन करीत नसलेल्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. गेल्या एका आठवडय़ात म्हणजे 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत 9 हजार 438 जणांना सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. यातून 19 लाख 25 हजार 100 रुपये वसूल करण्यात आला आहे.
राज्यात कोविड 19च्या दुसऱया लाटेने उग्र स्वरूप धारण केले असतानाही सर्वसामान्य लोक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत नसल्याने येत्या काळात महासंकट येऊ शकते. सर्रासपणे सर्वच कार्यक्रम समारंभात लोक विनामास्क वावरताना दृष्टीस पडतात. याचे परिणाम भयानक होण्याची दाट शक्यता आहे.
राज्यभरात पोलिसांनी गेल्या सात दिवसांत केलेल्या कारवाईत 9 हजार 438 जणांना मास्क न वापरल्याच्या कारणास्तव दंड ठोठावण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी 109 जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा तसेच मद्यपान केल्याप्रकरणी 133 जणांना दंड देण्यात आला आहे. यापैकी विनामास्क प्रकरणी उत्तर गोव्यात 3 हजार 914 जणांचा समावेश आहे. 53 जणांना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी दंड देण्यात आला आहे. तर 110 जणांना सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा खालल्या प्रकरणी दंड देण्यात आला आहे. दक्षिण गोव्यात 5 हजार 399 जणांना मास्क वापरल्या प्रकरणी दंड देण्यात आला आहे. 55 जणांना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तर 23 जणांना सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा खालल्या प्रकरणी दंड देण्यात आला आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी 125 जणांवर विनामास्क प्रकरणी कारवाई केली आहे.