शहरी भागात 250 तर ग्रामीण भागात 100 रुपये दंड आकारणार
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी इशारा देऊनसुद्धा नागरिकांकडून सुरक्षा मार्गसूचीचे पालन होत नसल्याने राज्य सरकारने कठोर भूमिका घेत मास्क न वापरणाऱयांवर शहरी भागात 1000 रुपये तर ग्रामीण भागात 500 रुपये दंडाची कारवाई करण्याचा आदेश दिला. मात्र, जनतेतून तीव्र विरोध दर्शविण्यात आल्यामुळे सरकारने दंडाच्या रकमेत कपात केली आहे. त्यानुसार आता शहरी भागात 250 रु. तर ग्रामीण भागात 100 रु. दंड आकारणी करण्याचा आदेश मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिला आहे.
तज्ञांची मते आणि जनतेतून विरोध झाल्यामुळे दंडाच्या रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सकाळी दिला आहे. कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने वेळोवेळी मार्गसूची जारी करून मास्क परिधान करण्याची सूचना नागरिकांना दिली आहे. मात्र, नागरिकांकडून या सूचनेची गांभीर्याने दखल घेण्यात येत नसल्याने सरकारने मागील आठवडय़ात सार्वजनिक स्थळी मास्क न वापरणाऱयांकडून शहरी भागामध्ये 1 हजार रु. आणि ग्रामीण भागात 500 रु. दंड आकारण्याचा आदेश जारी केला होता. दरम्यान, लॉकडाऊन आणि कोरोना परिस्थितीमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे इतक्या प्रमाणात दंड आकारणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दंडाची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला.