मंगळवारी 4,500 रुपये दंड वसूल, मोहीम तीव्र करणार : कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. देशाबरोबरच राज्यातही कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख चढताच आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेकडून ही कारवाई सातत्याने सुरू असून, मंगळवारी ही कारवाई करून 4,500 रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालण्याची सूचना आरोग्य खात्याने केली होती. तसेच सामाजिक अंतर राखण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने मास्क वापरण्याबरोबरच सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
बाजारपेठेसह सभासमारंभ, विवाह सोहळे, व आंदोलनाच्या ठिकाणी नागरिक गर्दी करत आहेत. मात्र सध्या कोरोनाचा प्रसार पुन्हा झपाटय़ाने वाढत आहे. देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खराब वातावरणामुळे प्रसार वाढला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याची सूचना आरोग्य खात्याच्यावतीने करण्यात आली आहे. याकरिता उपाययोजना राबविण्याबरोबरच खबरदारी घेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच सामाजिक अंतर राखण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. व्यवसायिकांसह ग्राहक देखील मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने विनामास्क फिरणाऱयांकडून दंड वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. मागील दहा दिवसांपासून ही कारवाई जोमाने सुरू आहे. त्यामुळे मागील दहा दिवसांच्या कालावधीत 1 लाख रुपयांच्या घरात दंड वसुली करण्यात आली आहे. मंगळवारी शहराच्या विविध भागात विनामास्क फिरणाऱयांकडून 4,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.