मनपाकडून कारवाई : 434 जणांकडून 43,400 रुपये दंड वसूल
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात फिरताना मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर ठेवण्यासह सार्वजनिक स्थळी थुंकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र बहुतांश नागरिक मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मास्क वापरा, अन्यथा दंड भरा असा बडगा सुरू करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसात 434 नागरिकांवर कारवाई करून 43 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, काही व्यवसाय सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मास्क घातला नसल्यास शंभर रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करून नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे आणि सामाजिक अंतर राखण्याची गरज आहे. पण याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याने महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्यात येत आहे. प्रथम सूचना देऊन सोडण्यात येत आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसात 434 नागरिकांना विनामास्क पडकण्यात आले असून 43 हजार 400 रुपये दंड महापालिका प्रशासनाने वसूल केला आहे. शहरातील सर्व वॉर्डमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असून स्वच्छता निरीक्षक, महसूल निरीक्षक, वॉर्ड क्लार्क आदींसह मनपाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करीत आहेत.