कारवाई करताच ग्रामस्थांना आली जाग : जांबोटी भागात नोडल अधिकाऱयांच्या कारवाईमुळे सर्वजण झाले सावध
वार्ताहर / खानापूर
जांबोटी विभागातील काही गावात मास्क न वापरता फिरणाऱया ग्रामपंचायत सदस्यांवरच दंडात्मक कारवाई केल्यामुळे त्या गावातील नागरिकात एकच धास्ती निर्माण झाली. दंडात्मक कारवाईला सुरुवात करताच घरात जाऊन प्रत्येकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली. नोडल अधिकाऱयांनी लोकप्रतिनिधींवरच अशी दंडात्मक कारवाई केल्यामुळे सदर गावातील लोकांनी मास्क वापरण्यावर भर देऊन नोडल अधिकाऱयाला दंडात्मक कारवाई न करण्याची विनंती केली.
जांबोटी भागातील पाच ग्रामपंचायतींसाठी रामचंद्र मराठे या अधिकाऱयाची नियुक्ती केली आहे. सदर अधिकारी प्रत्येक गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन गावात जाऊन जागृती अभियान राबवत आहेत. गावागावात जाऊन मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखण्यासाठी घरी राहून सुरक्षित राहण्यासाठी प्रेरीत करत आहेत. तसेच आजारपण वाढल्यास त्या लोकांनी जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचीही विनंती केली जात आहे. परंतु ग्रामीण भागातील अनेक लोकांनी निष्काळजीपणाचा कळस गाठला आहे. मास्क वापरण्यासंदर्भात कोणालाच काळजी नसल्याने अधिकाऱयांनी आता दंडात्मक कारवाईचा पवित्र घेतला आहे. जांबोटी जवळील एका गावात सदर नोडल अधिकारी सर्व्हे करत असताना ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी विनामास्क हजर झाले असता तीन विविध गावांमध्ये विनामास्क आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांवरच दंडात्मक कारवाई करून शंभर रुपयांची पावती फाडली. सदर बाब गावातील नागरिकांना कळताच लोकांनी तातडीने मास्क वापरून बाहेर पडणे पसंत केले.
सदर कारवाईमुळे त्या गावातील जवळपास 500 हून अधिक लोकांमध्ये एकाचवेळी जागृती झाली व गावातील प्रत्येक नागरिक घराबाहेर पडताना मास्कचा वापर करताना दिसले. एकूणच त्या नोडल अधिकाऱयाने लोकप्रतिनिधींवरच कारवाईचा बडगा उगारताच सर्वसामान्य जनताही जागृत झाली.
दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश
तालुक्मयातील 51 ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीने अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. ग्रामपातळीवर कोरोना संसर्गाने अनेक लोक पीडित झाले आहेत. परंतु त्यांचे पालन करण्यात ग्रामीण भागातील लोकांमध्ये जागृती झाली नाही. प्रशासनानेही मास्क न वापरणाऱयांना दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश बजावले आहेत. यासाठीच सदर नोडल अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामीण भागामध्ये कोरोना संसर्गाचा वाढता कल लक्षात घेता प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. परंतु खेडय़ातील अनेक लोक गावा-घराबाहेर पडताना शेताकडे जाताना अथवा रोजगारासाठी जाताना मास्क वापरत नाहीत.
कट्टय़ा-कट्टय़ावर घोळका करून बसण्यातच धन्यता मानतात. परंतु अशातूनच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक वाढत चालला आहे. यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे.
जीवन अनमोल आहे, नियमांचे पालन करा
‘त्या’ अधिकाऱयांबरोबर काहींनी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केल्याचे समजते. परंतु त्यांनी शासनाने घालून दिलेला नियम हा तुमच्या जीविताच्या संरक्षणासाठीच आहे. आपले जीवन अनमोल आहे. आपल्यापासून दुसऱयाला त्रास होणार नाही आपणही जगा व दुसऱयालाही जगू द्या असा संदेश या अधिकाऱयाने देताच तेथील लोकांचे समाधान झाले व यापुढील गंभीर परिस्थितीत सर्वांनी मास्क वापरून सामाजिक अंतर राखून नियमांचे पालन करण्याची ग्वाही दिली. कोरोना महामारीचा हा संसर्ग वाढतच चालला आहे त्यामुळे जीव बचावासाठी आता मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, घरी राहून सुरक्षित राहणे हा एकच पर्याय आता उरला आहे. परंतु खेडय़ापाडय़ातील नागरिकांना कोरोना महामारीचे म्हणावे तेवढे गांभीर्य नसल्याने अनेकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रशासनानेही आता प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर नोडल अधिकाऱयाची नियुक्ती करून मास्क न वापरणाऱयावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश बजावले आहेत.