26/11 हा दिवस भारताच्या इतिहासातील काळा दिवस. पाकिस्तानी अतिरेक्मयांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करून अनेकांचे प्राण घेतले. पण शत्रूराष्ट्राला आता भारताचे बळ कळून चुकले आहे. सध्याच्या कोरोनाकाळात शत्रू राष्ट्राची स्थिती अतिशय नाजूक बनली आहे. त्यामुळे मनातून तेथील राज्यकर्ते भारताला घाबरून आहेत. परंतु हे सारे होण्यासाठी मध्यंतरी बरीच उलथापालथ झाली. सरकार बदलले आहे. त्यामुळे धोरणेही बदलली आहेत. एकेकाळी भारतावर अनेक परकियांनी आपली सत्ता चालवली. परंतु त्यांना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांसारख्या एका द्रष्टय़ा, चतुरस्त्र, जाणत्या, मुत्सद्दी आणि पराक्रमी राजाचा त्यासाठी उदय व्हावा लागला. मोगलांना त्यांनी ताळय़ावर आणले. शत्रूला वठणीवर कसे आणायचे हे त्यांना पक्के माहीत होते.
हस्ती चांकुशहस्तेन कशाहस्तेन वाजिन:।
शृंगी लगुडहस्तेन खड्गहस्तेन दुर्जन:।।.
अर्थ:- हत्ती अंकुशाच्या हाताने, घोडा चाबकाचा हाताने, शिंगे असलेला प्राणी काठीच्या हाताने तर दुर्जन तलवारीच्या हाताने वठणीवर येतो. अशा प्रकारे कोणाला कसे वठणीवर आणावे हे एका संस्कृत सुभाषितातही सांगितले आहे. यात नाठाळ प्राण्यांना कसे वठणीवर आणावे हे सांगितले आहे, ते सोपे आहे. पण दुर्जनाला कसे ताळय़ावर आणावे? तर त्यासाठी तलवारच वापरावी लागते! जसे अफझलखानासारख्या दुष्ट आणि कपटी माणसाला शिवाजी महाराजांनी वाघनखे वापरून त्याचा कोथळा बाहेर काढला आणि शत्रूचा डाव उधळून लावला. कौरवांचे हृदय परिवर्तन करण्यासाठी पांडव आणि आणि श्रीकृष्णाने किती प्रयत्न केले? पण शेवटी त्यांना शस्त्रांचा वापर करावा लागला. तेव्हा ते ताळय़ावर आले. पाकिस्तानशीसुद्धा भारताला तीन वेळा युद्ध करावे लागले. तरीही ‘नलिकागतमपि कुटिलं न भवति सरलं शुन: पुच्छम्’ म्हणजे नळीत घातले तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अशीच पाकिस्तानची अवस्था आजही आहे. म्हणून त्यांच्या शस्त्रांना शस्त्राने उत्तरे देण्याची वेळ भारतावर येत आहे. वाटाघाटी, चर्चा इत्यादी सर्व साम, दाम, दंड इ.सर्व उपाय वापरून झाले. पण उपयोग शून्य. त्यामुळे आता शत्रूवर विनाश ओढवून घेण्याची वेळ आली आहे. तरीही त्यांचे डोळे उघडत नाहीत. अशाप्रकारे ज्याला स्वतःचे हित कळत नाही, त्याचा विनाश अटळ असतो. म्हणूनच ‘विनाशकाले विपरीत बुद्धि:।’ असे म्हटले जाते. म्हणूनच शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी, आपल्या सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी, सर्व भारतीय नागरिकांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच देशाच्या सार्वभौमत्वासाठी देशाच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. संकटकाळी आपापसातले भेदभाव विसरून एकजुटीचे दर्शन सर्वांनी घडवले पाहिजे! ‘जागे रहा, रात्र वैऱयाची आहे!’ असाच सध्याच्या काळाचा संदेश आहे.