प्रतिनिधी/ खेड
मुंबई, पुणेसारख्या हॉटस्पॉटमधून कोकणात येणाऱया वाहनाची कशेडी चेकपोस्टवर पुन्हा एकदा तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पास नसणाऱया वाहनचालकांना यापुढे जिल्हय़ात ‘एन्ट्री’ मिळणार नसून कशेडी येथूनच माघारी पाठावले जाणार आहे.
कोकणातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केल्यानंतरच जिल्हय़ात सोडण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या भीतीने असंख्य चाकरमानी मुंबई, पुणेतून पायी प्रवास करत गावी दाखल होत होते. या सर्वांना कशेडी चेकपोस्टवर अडवून क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र, त्यानंतर निर्बंध शिथिल करून वाहनांना थेट गावी जाण्याची मुभा मिळाली. तथापी चाकरमान्यांमुळे जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने प्रशासनाने कशेडी चेकपोस्टवर पुन्हा वाहनांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतून विना ई-पास कोकणात येणाऱया चाकरमान्यांना यापुढे जिल्हय़ात प्रवेश मिळणार नाही. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कशेडी चेकपोस्टवर 15 पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येक वाहनांवर करडी नजर ठेवून कसून तपासणी करण्यात येत आहे.
कोरोनाच्या भीतीने असंख्य चाकरमानी यापूर्वी गावी डेरेदाखल झाले आहेत. विनापास गावी येण्याची मुभा दिल्यानंतर चाकरमान्यांचा ओघ वाढला आहे. अजूनही मुंबई, पुणेतून गावी येणाऱया चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक आहे. याच चाकरमान्यांमुळे जिल्हय़ात कोरोनाचा फैलाव झपाटय़ाने होत आहे. याचमुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कशेडी चेकपोस्टवर पुन्हा वाहनांची तपासणी सुरू केली आहे.
या तपासणीमुळे गावी येणाऱयांची डोकेदुखी आणखीनच वाढली असून विना ई पास नसल्यास आल्या पावली परत जावे लागत असल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पास असलेल्या वाहनांची नावनोंदणी करण्यात येत असून यामुळेही वाहनचालकांची रखडपट्टी होत आहे. कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या विन्हेरेमार्गे वाहने येण्याची शक्यता गृहित धरून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांच्या दिमतीला कशेडी येथील वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात आहेत.