दत्तात्रय मारुती तथा द. मा. मिरासदार यांचे शनिवारी वयाच्या 94 वर्षी वृद्धापकाळी पुण्यात जावई रवींद्र मंकणी यांचे निवासस्थानी निधन झाले आणि वाङ्मय क्षेत्रात विशेष करुन विनोदी लेखन व कथाकथन क्षेत्रात मोठे नाव, काम आणि अधिकार असलेले एक व्यक्तिमत्त्व काळाआड गेले. त्यांची या क्षेत्रातली मिरासदारी मराठी जनांच्या काही पिढय़ांना हसवत, आनंद देत आणि चांगल्या दर्जेदार विनोदाची विपुल मेजवानी देत आली आहे. ओघानेच त्यांच्या निधनाचे दुःख आहे. तथापि व्यंकूची शिकवणी, चोरांचे संमेलन, भूताचा जन्म या व अशा अजरामर कथा द. मां. ची थोरवी सांगत रसिकांना पिढय़ा न् पिढय़ा रिझवत राहणाऱया आहेत. द. मा. मिरासदार पुण्याचे असले तरी पुणेरी नाहीत. ते पंढरपूरचे अकलूज हे त्यांचे जन्मगाव. सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न होती. सत्यकथेवर 1950 साली त्यांनी रानमाणूस चितारला, अक्षरबद्ध केला आणि या प्रारंभानंतर मागे वळून बघितले नाही. तो काळ मंतरलेला होता. साक्षरता वाढत होती. नवसाक्षर घडत होते आणि मराठीत चिं. वि.जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे असे सारस्वत विनोदी वाङ्मय निर्मितीत आघाडीवर होते. या काळात द. मा. नी ग्रामीण ढंगात आणि मराठमोळा साज सांभाळून लिखाणाला प्रारंभ केला. गाव चावडीतील व्यक्तिरेखा त्यांनी वाङ्मयात आणल्या आणि मराठी वाचकांनी त्यास पसंतीची टाळी दिली. द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या तिघांचे मराठीवर व मराठी वाङ्मयावर मोठे उपकार आहेत. यांनी मराठी कथा, मराठी पुस्तके शिक्षणाच्या प्रसारानंतर नवसाक्षर ग्रामीण वाचकांपर्यंत नेली. लोकमान्यांनी सुरू केलेला गणेश उत्सव आणि शाळा, महाविद्यालयांची स्नेहसंमेलने यामध्ये या तिघांचे कथाकथनाचे हजारो कार्यक्रम झाले. तीन साहित्यिक एकत्र येऊन कथाकथनाचा प्रयोग करतात आणि हा प्रयोग लोक उचलून धरतात असे क्वचितच अन्य भाषिक वाङ्मयात झाले असावे. कथाकथन असा विषय आज कुठेही निघाला की या तिघांची रसिकांना आठवण येते आणि मिरासदारांची व्यंकूची शिकवणी आणि शंकर पाटलांची मिटींग कानात घुमू लागते. तिघांची शैली वेगळी, मांडणी वेगळी. बाज वेगळा, विषय वेगळे. लोक हसून-हसून तृप्त होत. तो काळच वेगळा होता. याचवेळी सुधीर फडके यांचे गीतरामायणाचे कार्यक्रम होत. गाण्याच्या मैफली जे. एल. रानडे वगैरेंची भावगीते, बाबासाहेब पुरंदरेंच्या खचाखच गर्दी करणाऱया शिवचरित्र व्याख्यानमाला, शिवाजीराव भोसलेंची विवेकानंदांवरची भाषणे असे सारे मंतरलेले, भारलेले श्रीमंत मराठी विश्व होते. हे विश्व निर्माण करण्यासाठी ज्यांनी मोलाची कामगिरी केली त्यामध्ये द. मा.मिरासदार यांचा सहभाग होता. गदिमा, पु. ल. देशपांडे, सुधीर फडके अशी कित्येक नावे या श्रीमंत, समृद्ध कालखंडावर नोंदली गेली आहेत. नंतरचा काळ हा माहितीचा, रंजनाचा व अनेकविध मीडियाचा आला. पण एकेकाळची ही गंमत राहिली नाही. पूर्वीचा कसही राहिला नाही आणि अजिर्ण होईल इतके हे सारे अंगावर येणारे मनोरंजन जळीस्थळी उपलब्ध झाले. तथापि आजही या गर्दीत जे कसदार मनाचा ठाव घेणारे आहे ते टिकले आहे. टिकणार आहे. मिरासदार यांचे बालपण पंढरपुरात गेलेले. ओघानेच त्यांच्या कथात पंढरपुरी माणसं भेटतात. पंढरपूरला वारीला येणारी माणसे, त्यांचा गावगाडा, चावडीवरची चटकदार पात्रे, त्यांचे किस्से त्यांनी विनोदी शैलीत अक्षरबद्ध केले. ते पुण्यात गेले तरी त्यांचा पंढरपुरी वावर होत असे. पंढरपुरात चौकात चौपाळय़ावरच्या गप्पागोष्टीतून त्यांना अनेक कथाबिजे मिळत आणि त्यांच्या गप्पाष्टकांतून पंढरपूरकरांना भरभरुन आनंद मिळत असे. सर्व प्राणीमात्रात माणूसच हसू शकतो. गाढवे ओरडतात, कुत्री रडतात. माणसाने हसले पाहिजे असे सांगत त्यांची मैफल सुरु व्हायची ती संपू नये असे वाटायचे. द. मा. मिरासदार यांच्या नावावर 24 कथासंग्रह आहेत. त्यांनी चित्रपटावरही आपला ठसा उमटवत सुमारे अठरा चित्रपटांच्या कथा, पटकथा, संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटात त्यांनी शिक्षकाची भूमिकाही साकारली होती. त्यांच्या विनोदात अश्लीलता नाही तर सहज मानवी प्रवृत्तीतून उमलणारा टवटवीत विनोद आहे. जीवनातील विसंगती, इरसाल माणसे आणि विक्षिप्तपणा याचा अभ्यास करून त्यांनी वाङ्मय निर्मिती केली आहे. जबरदस्त निरीक्षणशक्ती, उत्तम शैली आणि विनोदाची जाण व अभ्यास यामुळेच हे शक्य झाले आहे. द. मा. मिरासदार यांना विं. दा. करंदीकर जीवनगौरव, पुलोत्सव जीवनगौरव, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले. परळी वैजनाथ येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अनेक संमेलनात ते सहभागी होत. पुण्यात अलीकडेच झालेल्या साहित्य संमेलनात ‘भूताचा जन्म’ ही गोष्ट त्यांनी ऐकवली आणि अवघा साहित्यमंडप हास्यकल्लोळात बुडून गेला. त्यांची विद्यार्थी चळवळीशीही नाळ जोडली गेली होती. अ.भा.वि.प.चे ते प्रदेश अध्यक्ष होते. विद्यार्थी प्रश्नावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर ते आग्रही असायचे. कथाकथन आणि विद्यार्थी परिषद या निमित्ताने त्यांनी अवघा महाराष्ट्र उभा-अडवा पिंजून काढला होता. महाराष्ट्राबाहेर आणि विदेशातही त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम झाले. रसिकांनी त्यांच्या विनोदी कथांना जशी दाद दिली तशी गंभीर वाङ्मयालाही पसंती दिली. त्यांचे चित्रपटही लोकप्रिय झाले. पंढरपूरचा एक अवलिया सरस्वतीची वीणा हाती घेऊन मराठी सारस्वतांची आणि रसिकांची सेवा करत राहिला. या क्षेत्रात त्यांनी आपली मिरासदारी निर्माण केली. ही मिरासदारी कायम राहणार आहे. रसिकांना आनंद देत राहणार आहे. द. मा. ना दीर्घायुष्य लाभले आणि त्यांनी उत्तम वाङ्मय सेवा केली. मराठी साहित्यात मोलाची भर घातली, त्या द. मा. मिरासदारांना भावपूर्ण आदरांजली.
Previous Articleजपानच्या पंतप्रधानपदी फुमिओ किशिदा
Next Article अभिमान, दुराग्रह सोडल्याने मनुष्य प्रिय होतो
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.