बेळगाव : महिलांचे स्वातंत्र्य हा आजही चर्चेचा विषय आहे. विशेषतः ग्रामीण भागात आजही महिलांना उंबरठय़ाबाहेर पडून निर्णय घेण्याचे कोणतेच अधिकार नाहीत. त्यामुळे समोर असणारी परिस्थिती व त्यांच्यावर थोपवलेले निर्णय यातून त्यांची झालेली घुसमट कथाकथनकार हिंमत पाटील यांनी आपल्या ‘माती’ या कथेतून मांडली. बहुतेक महिलांच्या बाबतीत हाच अनुभव असल्याने उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त दाद दिली.
उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱया सत्रात हिंमत पाटील यांनी कथा सादर केली. आपल्या आजोबांच्या रक्षाविसर्जनाला जाता यावे यासाठी महिलेची असलेली धडपड, परंतु तिच्या नवऱयाच्या तिरसट स्वभावामुळे येणारे व्यत्यय, अनेक अटी-नियम लावून रक्षाविसर्जनाला जाण्यास तयार झालेला नवरा, तेथे घडलेल्या गमती-जमती या विनोदी अंगानी सादर केल्या. परंतु कथेच्या शेवटी आपण पारतंत्र्यात आहोत, आपणास निर्णय घेण्यास कोणतीही परवानगी नाही, याची जाणीव तिला होते. त्यामुळे या कथेतून हिंमत पाटील यांनी महिलांच्या स्वातंत्र्यावर विनोदी अंगाने भाष्य करून समाजाला विचार करण्यास भाग पाडले.
कथेची सुरुवात चिऊकाऊच्या गोष्टींपासून झाली असावी. मराठीतील पहिली कथा शिवाजी राजांचे वंशज सरपोजी राजे यांनी लिहिली. खांडेकरांनी तुकाराम, ज्ञानेश्वर घराघरात पोहोचविले. ग. दी. माडगुळकर यांनी कृष्णाची करंगळी मोडली ही पहिली कथा व्यासपीठावर सादर केली. ग्रामीण भागात व्यथा व वेदना यासोबतच विनोदी लेखनही कथेच्या माध्यमातून होत गेले, असे हिंमत पाटील यांनी सांगितले.