माणूस कोणापासून काय शिकेल हे सांगता येत नाही. माझ्या लहानपणी एक मजेदार प्रसंग घडला आणि मी एक गोष्ट नकळत शिकलो.
आमच्या शाळेत ‘पेटी वाचनालय’ नावाचा प्रकार होता. ऑफ तास असेल तेव्हा शिपाई लाकडी पेटी घेऊन वर्गात यायचा आणि पेटीतली गोष्टींची पुस्तके सर्वांना वाटायचा. तास संपेतो आम्ही वाचत शांत बसावे आणि आसपासच्या वर्गातील मुलांना गोंगाटाचा त्रास होऊ नये, म्हणून. त्या पेटीत अनेक पुस्तके वाचून झाली. विजेची वेल (अनंत काणेकर), श्यामची आई, श्याम (साने गुरुजी), साखरझोप (गं. भा. निरंतर), गुजगोष्टी (ना. सी. फडके), साष्टांग नमस्कार (आचार्य अत्रे), इंदिरेस पत्रे (जवाहरलाल नेहरू), स्फुट गोष्टी (ह. ना. आपटे), गोटय़ा (ना. धों. ताम्हणकर), बापूजींच्या गोड गोष्टी, विनोबांच्या गोष्टी वगैरे.
‘विनोबांच्या गोष्टी’मध्ये एक मजेदार प्रसंग होता. लहानगा विनू नातलगांकडे जेवायला जातो. जेवताना पानात कारल्याची कडू भाजी पाहून विनू दचकतो. घरातील संस्कारांमुळे भाजी उष्टी टाकणे शक्मय नाही. मग तो विचार करतो, पटकन ही भाजी कशीतरी संपवावी आणि मग इतर आवडलेले पदार्थ खावेत. मनाचा निग्रह करून तो घाईघाईने भाजी संपवतो. यजमान काकूंचा गैरसमज होतो की त्याला कारल्यांची भाजी आवडलेली दिसते. त्या पुन्हा त्याला भाजी-आणि तीही सढळ हाताने वाढतात. तीही भाजी विनोबांना खावी लागते. त्या प्रसंगी कारल्यांची भरपूर भाजी खावी लागल्यामुळे ती आपोआप आवडू लागते.
तोवर मी स्वतः कारल्यांची भाजी खाल्ली नव्हती. त्यामुळे कुतूहल निर्माण झाले. मोठय़ा माणसांपाशी मी सतत हट्ट आग्रह धरला तेव्हा सगळे हसले. एकदा नाईलाजाने ती भाजी आणली गेली आणि शिजवली गेली. मी जेवायला बसल्यावर आई वडील आणि थोरली चुलत भावंडे माझी गंमत बघायला टपून बसली होती. मी पहिला घास घेतला आणि ब्रह्मांड आठवले. पण सगळे माझ्याकडे माझ्या फजितीची वाट बघत होते. मग काय, कोणी हसू नये, चिडवू नये म्हणून ती भाजी संपवली, आवडल्याचं जाहीर केलं. मी एक विचित्र बाळ आहे असं सगळय़ांनी ठरवलं. पण सवयीने मला खरोखरच भाजी आवडू लागली. अर्थातच सगळे श्रेय विनोबांना. त्यांचे गंभीर साहित्य वाचतो तेव्हा हमखास ही मजेदार गोष्ट नक्की आठवते.