कुडाळ-पिंगुळी-पाट-परुळे रस्त्याची दुरवस्था
विमानतळाच्या श्रेयासाठी चढाओढ
रस्त्याकडे लक्ष द्यायला नेत्यांना वेळ नाही
महत्वाचा रस्ता अक्षरश: खड्डय़ात
प्रतिनिधी / कुडाळ:
चिपी-परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ सुरू करणे व त्याच्या श्रेयावरुन राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, विमानतळ ते मुंबई-गोवा महामार्ग या दरम्यान मुख्य जोडरस्ता असलेल्या कुडाळ-पिंगुळी-पाट-परुळे विमानतळ या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यायला मात्र राजकीय नेत्यांकडे वेळच नाही.
यावर्षी या रस्त्यावर एकही पैसा खर्च झालेला नाही. सध्या हा महत्वाचा रस्ता खड्डय़ातच बुडाला आहे. अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विमानतळ नंतर, पण आधी रस्त्यावरील खड्डे बुजवा, अशी मागणी वाहनधारक करू लागले आहेत.
विमानतळाच्या प्रवेशद्वारावरुन थेट मुंबई-गोवा महामार्गाला जोडला जाणारा परुळे-पाट-पिंगुळी-कुडाळ हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. विमानतळ व हायवे जोडणारा हाच मुख्य रस्ता आहे, याची जाणीव लोकप्रतिनिधी, नेते व अधिकारी या सर्वांना आहे. विमानतळाचे काम पूर्ण करून विमानतळ सुरू करण्यासाठी गेली तीन वर्षे राज्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. मात्र, विमानतळ कामातील त्रुटी, चुकीच्या पद्धतीने केलेले काम, पाणी, वीज या सुविधा देण्यात झालेली दिरंगाई यामुळे विमानतळ सुरू होण्यास मुहुर्त मिळत नाही.
मग रस्ता तयार करण्यास निधी का नाही?
विमानतळ सुरू झाला, तर महामार्गापर्यंत जाणारा रस्ता सुस्थितीत हवा, याची जाणीव लोकप्रतिनिधी व अधिकाऱयांना असणे आवश्यक होते. नॅशनल एअरपोर्ट ऍथॉरिटीने मुख्य रस्ता योग्य नसल्याचा आक्षेपही घेतला होता. मात्र, गेली तीन वर्षे या रस्त्याच्या कामासाठी म्हणजे रुंदीकरण व मजबूतीकरणासाठी शासनाने पैसा का उपलब्ध करून दिला नाही?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्यावर्षी तर या रस्त्यावर डांबरीकरणासाठी एकही पैसा खर्च झालेला नाही. तालुक्यात कोटय़वधी रु. रस्ते व विकासकामांना दिले, असे सांगितले जाते. मग या महत्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष का केला, हे कोडेच आहे.
अधिकारी निष्क्रिय : खड्डे बुजविण्यातच धन्यता
पिंगुळी-पाट या रस्त्याच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करतात. खड्डे पडल्यावर ते बुजविण्यातच धन्यता मानतात. कारण खड्डे बुजविण्याच्या कामात मोठय़ा प्रमाणावर निधी हडप करणे शक्य होते. गेल्या एक-दीड वर्षात पूर्णपणे उखडलेल्या सात ते आठ किमी. रस्त्यावरील अर्धा किमी. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अधिकाऱयांनी प्रस्तावित का केले नाही?, असा सवाल उपस्थित होत आहे.
गटारच नसल्याने रस्त्याला ओढय़ाचे स्वरूप
या रस्त्याला बहुतांशी ठिकाणी गटार नसल्याने जरा पाऊस पडला, तरी रस्त्याला ओढय़ाचे स्वरुप येते. संपूर्ण रस्त्यावरुन पाणी वाहते. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरील खड्डय़ांची कल्पना येत नसल्याने गंभीर अपघातही होत आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार होणे आवश्यक आहे.
लोकच बुजवितात गटार
काही ठिकाणी गटार खोदण्यात आले. मात्र, तेथील लोक आपली वाहने घरी नेता यावीत, यासाठी गटारे स्वत: बुजवितात. खरंतर अशांवर संबंधित ग्रा. पं. मार्फत कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, अधिकाऱयांना रस्त्याबाबत काळजी नसल्याने तेही दुर्लक्ष करीत आहेत.
डंपर वाहतूक आणि मोठमोठे खड्डे
या मार्गावरुन बेकायदा वाळूची वाहतूक होत असते. रात्रीच्या वेळी सुसाट डंपरमुळे रस्तेही उखडतात. पाट, हुमरमळा, माडय़ाचीवाडी व करमळगाळू येथे मोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले असून वाहनधारकांच्या जीवितास धोकादायक ठरणारे आहेत. त्यामुळे तात्काळ ते खड्डे दगड-डांबराने बुजवावेत. अन्यथा गणेशोत्सव काळात हा रस्ता वाहतुकीला पूर्णपणे धोक्याचा ठरेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने पाहून तात्काळ दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.