सिंधुदुर्ग जिल्हय़ातील चिपी येथील विमानतळाचा लोकार्पण सोहळा 9 ऑक्टोबरला होत आहे. वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोकणवासीयांचे विमानतळाचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. या विमानतळ प्रकल्पामुळे कोकणच्या पर्यटन विकासाला अधिक चालना मिळणार आहे. मात्र या विमानतळावरून राजकीय श्रेयवाद सुरू आहे. हा श्रेयवाद घालण्यापेक्षा विमानतळ परिसरात अत्यावश्यक सुविधा निर्माण करून रेंगाळलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्यास विकासाची झेप घेता येईल.
पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हय़ाबरोबरच कोकणच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारा सिंधुदुर्ग चिपी विमानतळ प्रकल्प वीस वर्षांपूर्वी मंजूर झाला. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप झेलत विमानतळाचे काम पूर्ण झाले. कोकणमध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढविणे आणि पर्यटनाचा विकास करणे या दृष्टीने सिंधुदुर्ग विमानतळ उभारण्यात आले. 274 हेक्टर जागेवर हा विमानतळ आकाराला आला आहे. विमानतळाची धावपट्टी सात मीटर रुंद व रुंदी अडीच मीटर लांबीची आहे. सद्यस्थितीत तीन विमाने पार्क करण्याची सुविधा या विमानतळावर असून दुसऱया टप्प्यात पंधरा विमाने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या दिवसा एका विमानाचे लँडिंग होणार असून नाईट लँडिंगसाठी व्यवस्था लवकरच केली जाणार आहे. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी प्रयत्न असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. पण त्यासाठी वेळकाढूपणा न करता ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहेत. तसेच मुंबई-पुण्यासह देश-विदेशातील नागरिकांना कोकणबद्दल मोठे आकर्षण आहे. याचे कारण की कोकणातील, खास करून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सागरी किनारे, सहय़ाद्रीच्या पर्वतरांगा लगतच्या गोवा राज्याला पर्याय असून पर्यटकांना भुरळ घालतात. पण त्या ठिकाणी आवश्यक रस्ते, निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था आदी पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या नाहीत. त्या वेळेत पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
550 कोटी रुपयांचा हा सिंधुदुर्ग विमानतळ जवळपास आठशे कोटी रुपयांवर पोहोचला आहे व 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वास गेला आहे. त्यामुळे वीस वर्षांनंतर का होईना, कोकणवासीयांचे विमानतळाचे स्वप्न सत्यात उतरले आहे. पण या प्रकल्पाला पूरक आवश्यक असणाऱया पायाभूत सोयी सुविधांचे काय, असा प्रश्न आहे. मुंबई-गोवा महामार्गापासून सिंधुदुर्ग विमानतळाला जोडणारा महत्त्वाचा असलेला कुडाळ-पिंगुळी-पाट हा मार्ग सद्यस्थितीत खड्डय़ातच आहे. त्यामुळे तीस मिनिटांच्या प्रवासाला एक ते दीड तास लागत आहेत. या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याचे सत्ताधाऱयांकडून सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात रस्त्याचे काम पूर्ण कधी होणार, हा प्रश्न आहे. विमानतळ होण्याबरोबरच विमानतळाकडे जाण्या-येण्यासाठी मुख्य रस्ते सुसज्ज असणे आवश्यक आहेत. लगतच्या गोवा राज्याला पर्यटन विकासामध्ये स्पर्धा करीत असताना विमानाने येणाऱया पर्यटकांना जिल्हय़ातील पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी उत्तम दर्जाच्या सुविधा मिळणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग ते मुंबई विमान प्रवासासाठी एक तास 25 मिनिटांचा वेळ लागणार आहे. मात्र विमानतळाला जोडणाऱया मुख्य रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे कुडाळ ते सिंधुदुर्ग विमानतळ जाण्यासाठी एक ते दीड तासाचा तोही खड्डय़ातून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे विमानतळावरून श्रेयवाद घालणाऱया नेत्यांनी रस्त्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लावणे आवश्यक आहे. विमानाने येणाऱया प्रवाशांसाठी ये-जा करण्यासाठी गाडय़ांची व्यवस्था करण्याबाबत अद्याप काहीच व्यवस्था केल्याचे जाहीर केलेले नाही. लगतच्या गोवा राज्यात मोपा येथे दुसरे विमानतळ होत आहे. हे विमानतळ मुंबई-गोवा महामार्गालगत होत असल्याने विमान प्रवाशांना ये-जा करण्यासाठी अत्यंत सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे कोकणात येणारे पर्यटक, विमान प्रवासी सिंधुदुर्ग विमानतळावर जाण्याऐवजी गोव्याला जातील. हे थांबवायचं असेल आणि सिंधुदुर्ग विमानतळावरून पर्यटक व प्रवासी ये-जा करायला हवेत, तर विमानतळ परिसरात चांगल्या सोयी सुविधा निर्माण करायला हव्यात. सर्व पर्यटन स्थळे व तालुक्मयाच्या ठिकाणी जाण्यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते व्हायला हवेत.
कोकणाला लागून असलेल्या गोवा राज्यात मोठय़ा प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक येत असतात. गोवा राज्याची आर्थिक नाडीही पर्यटनावर अवलंबून आहे. तशाच पद्धतीने कोकणात पर्यटन विकास होऊ शकतो. येथील स्वच्छ समुद्र किनारे निश्चितच पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे विमानाने येणाऱया पर्यटकांना प्रत्यक्ष स्थळावर जाण्यासाठी सुविधाच नसतील, तर पर्यटक येणार नाहीत. त्यामुळे विमानतळाच्या श्रेयवादापेक्षा सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, तर पर्यटन विकासाला अधिक चालना मिळू शकते.
सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पण 9 ऑक्टोबरला होत असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रिय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या सोहळय़ापूर्वी शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात विमानतळ होण्यावरून श्रेयवाद रंगला खरा. वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विमानतळ झाले आहे. त्यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी खासदार सुधीर सावंत, केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत या सर्वांचेच श्रेय आहे. परंतु विमानतळाचे श्रेय घेत असताना जिल्हय़ात सी-वर्ल्डसारखे प्रकल्प, शासकीय मेडिकल कॉलेज व इतर रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लावण्याची जबाबदारीही नेत्यांनी स्वीकारली पाहिजे तसेच विमानतळासाठी ज्या भूमीपत्रांनी अल्प दरात जमिनी विमानतळासाठी दिल्या त्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्नही होणे आवश्यक आहे.
कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे निसर्गसंपन्न जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्हय़ात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा होऊन वीस वर्षे उलटली, तरी पर्यटनावर आधारित उद्योग आणले गेले नाहीत. रोजगाराची साधने निर्माण केली नाहीत. ती निर्माण करून श्रेयवाद घालायला हरकत नाही. त्यामुळे विमानतळाचे स्वप्न पूर्ण होताना कोकणवासीयांना आनंदच आहे. परंतु आगामी काळात इतर सोयीसुविधा निर्माण करून रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लावून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, हीच अपेक्षा आहे.
संदीप गावडे