वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विमानांवरील व्हीटी चिन्ह (व्हीटी कॉल साइन) हटविणे अवघड कार्य आहे. हे चिन्ह हटविण्यात आल्यास विमानांवर पुन्हा नवा कोड लिहावा लागणार आहे. यादरम्यान विमानाची सर्व कागदपत्रेही बदलावी लागतील आणि यामुळे देशावरील आर्थिक बोझा वाढणार असल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाकडून गुरुवारी संसदेत सांगण्यात आले आहे.
एअरलाइन्सवरील कॉल साइन ‘व्हीटी’ बदलण्याची मागणी भाजप नेते दीर्घकाळापासून करत आहेत. व्हीटीचा अर्थ व्हिक्टोरियन किंवा व्हाइसरॉय असा आहे. म्हणजेच भारतावर ब्रिटिशांचे राज्य. हा कॉल साइन भारताला ब्रिटिश सरकारकडून 1927 मध्ये देण्यात आला होता. भाजप नेते तरुण विजय यांनी दीर्घकाळापासून हा कॉल साइन बदलण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
हा कॉल साइन ‘ब्रिटिश राजवटीचा वारसा’ असून गुलामीचे प्रतीक आहे. व्हहीटी कॉल साइन भारताच्या सर्व प्रवासी विमानांवर लिहिलेले असते. व्हीटी कोडनंतर एअरलाइन्सच्या अन्य माहितीचा उल्लेख असतो.
भाजप खासदार हरीश द्विवेदी यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल नागरी उड्डाण मंत्रालयाने गुरुवारी संसदेत उत्तर दिले आहे. हा कॉल साइन हटवा म्हणणे सोपे असले तरीही ते अंमलात आणणे कठीण आहे. जर आम्ही व्हीटी कॉल साइन बदलला तर सर्व दस्तऐवज नव्याने प्रदान करावे लागतील. विमानांना नव्याने रंगवावे लागणार आहे. सर्व चिन्हांना बदलले जाईपर्यंत ही विमाने उड्डाण करू शकणार नाहीत. पूर्ण प्रक्रियेदरम्यान विमान जमिनीवरच उभे राहिल आणि याचा एअरलाइन्सना मोठा फटका बसणार असल्याचे नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग यांनी म्हटले आहे.
सरकारने स्वतःच्या उत्तरात व्हीटीचा अर्थ काय हे मात्र सांगितले नाही. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने भारताला कॉल साइन्सच्या तीन सीरिज म्हणजेच एटीए-एडब्ल्यूझेड, व्हीटीए-व्हीडब्ल्यूझेड आणि 8टीए-8वायझेड उपलब्ध केल्या होत्या. कॉल साइन सीरिजचा पहिला एक किंवा दोन अक्षरे असू शकतात. शिकागो करारातील कलम 7 च्या तरतुदींनुसार भारतीय नोंदणीकृत विमानांसाठी वरील तीन सीरिजसाठी स्वतःचा कॉल साइन निवडण्याचा पर्याय उपलब्ध होता.