नवी दिल्ली
कोरोना 19 चे संकट व त्याला लागून लॉकडाऊनने भारतीय हवाई क्षेत्राची हालत खराब झाली आहे. विमान कंपन्यांची आंतरराष्ट्रीय संघटना आयएटीएने 2020 मध्ये देशात विमान प्रवाशांची संख्या 49 टक्के इतकी घटणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने यासंबंधीची माहिती देताना, 2020 मध्ये भारतीय हवाई कंपन्यांचे उत्पन्न 11.68 अब्ज डॉलर्सवर राहणार असून मागच्या वर्षाच्या तुलनेत उत्पन्नातही निम्मी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आजवरच्या इतिहासात प्रथमच हवाई क्षेत्राला 2020 हे सर्वात खराब वर्ष जाणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. यावषी अनेक हवाई कंपन्यांना आपले अस्तित्व टिकवण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे. हवाई वाहतूक बंद असल्याकारणाने गेल्या तीन महिन्यापासून विमान कंपन्यांना कोटय़ावधी रुपयांचे नुकसान आंतरराष्ट्रीय स्तरावर सोसावे लागते आहे.