प्रतिनिधी/ रत्नागिरी
विमानतळाच्या धावपट्टीचे काम पूर्ण करण्यात आले आह़े मात्र सुरक्षेच्या दृष्टीने इतर कामे महत्वाची असल्याने ती कामे पुढील दीड वर्षात पूर्ण होतील़ यानंतर प्रवासी वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार असून रत्नागिरीतून विमान प्रवासाचे रत्नागिरीकरांचे स्वप्न लवकरच साकार होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिल़ी मंत्री सामंत यांनी रविवारी रत्नागिरी विमानतळाची पाहणी केल़ी यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
रत्नागिरी विमानतळ येथे सुमारे 2 हजार 100 मीटरची लांबी व 61 मीटर रूंदीची धावपट्टी तयार करण्यात आली आह़े त्यामुळे या ठिकाणाहून चिपी विमानतळाप्रमाणे 72 आसनी विमानसेवा सुरू होवू शकत़े रत्नागिरी विमानतळ हे कोस्टगार्डच्या ताब्यात असले तरी केंद्र शासनाच्या उडान योजनेत या विमानतळाचा समावेश करण्यात आला आह़े त्यामुळे या ठिकाणाहून विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे सामंत म्हणाले.
सुरक्षेच्या दृष्टीने या विमानतळाभोवती संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आह़े लवकरच हे कामही पूर्ण होणार आह़े त्याचप्रमाणे नाईट लँडीगची देखील सुविधा रत्नागिरी विमानतळावर करण्यात येणार आह़े काही विमानतळांवर प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर नाईट लँडीगची सुविधा करण्यात येत़े मात्र रत्नागिरी विमानतळाचा विचार करता प्रवासी वाहतूक सुरू होण्यापूर्वीच येथे नाईट लँडीगसाठी हे विमानतळ सुसज्ज असणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
भूमीहस्तातंरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार
विमानतळावर पार्किंग व इतर सुविधांसाठी भूमीअधिग्रहित करण्याच्याही कामाला प्राधान्य देण्यात आले आह़े यासाठी 72 कोटी रूपयांच्या प्रस्तावाला महाविकास आघाडी सरकारने तत्वतः मान्यता दिली आह़े त्यामुळे भूमीहस्तातंरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे, अशी माहिती यावेळी मंत्री सामंत यांनी पत्रकारांना दिल़ी
विमानतळ पाहणीवेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, कोस्टगार्डचे अधिकारी, नगरसेवक निमेश नायर आदी उपस्थित होत़े