वृत्तसंस्था/मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता हळुहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. हवाई उद्योगालाही सरकारने दिलासा देताना कंपन्यांना स्थानिक स्तरावर साठ टक्क्यांपर्यंत विमानांची वाहतूक करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात हवाई कंपन्यांना आपला विकासाचा वेग घेता येणे शक्य होणार आहे.
गेल्या 26 जून रोजी सरकारने हवाई मंत्रालयामार्फत 45 टक्केपर्यंत वाहतूक सुरू करण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे कंपन्यांनी सरकारचा आदेश पाळत कार्य बजावले होते. मार्चच्या शेवटी संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली. एप्रिल-मेमध्ये हवाई वाहतुकीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला होता. सरकारच्या आदेशानुसार सर्व प्रकारची हवाई वाहतूक रोखण्यात आली होती. पण नंतर परिस्थिती सुधारल्यावर कडक नियमात शिथिलता देण्यात येऊन हळूहळू विमानांची संख्या वाढवण्यात आली. स्थानिक स्तरावर विमानसेवेत वाढ करण्यात आली. हे करताना कोरोनाबाबतची सर्व ती काळजी घेण्याचे कार्यही कंपन्यांनी बजावले आहे. केंद्राच्या यासंबंधातल्या आवश्यक सूचना पाळण्याचे कार्य अनेक कंपन्यांनी पार पाडलं आहे.