रयत संघटनेच्यावतीने शेतकऱयांची जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या काही वर्षांपासून अवकाळी तसेच हंगामी पावसाने शेतकऱयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 2020-21 मध्ये मान्सून पावसाने अनेक शेतकऱयांची पिके वाया गेली होती. त्याचबरोबर 2021-22 मध्ये रब्बी हंगामातील पिके खराब झाली आहेत. त्या शेतकऱयांना विम्याची रक्कम अद्याप दिली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तेव्हा तातडीने त्या शेतकऱयांच्या बँक खात्यावर विमा कंपनीला रक्कम जमा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
2020-21 मध्ये मान्सून पावसाने भात पिकासह सोयाबीन, मूग व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱयांनी विमा भरला असतानाही त्यांना ती रक्कम दिली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अशाच प्रकारे 2021-22 मध्येही अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. जोंधळा, हरभरा ही संपूर्ण पिके खराब झाली आहेत. मात्र, विमा कंपनीने रक्कम दिली नाही. तेव्हा तातडीने रक्कम द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आमरण उपोषणाचा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन दिले. यावेळी रवी सिद्दमण्णावर, सुरेश तुबाकी, बी. ए. गुरण्णावर, राजू मरवे, बी. जी. शेट्टी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.