गौतम गंभीरचे रोखठोक प्रतिपादन, तंदुरुस्तीमुळेच विराट टी-20 मध्ये यशस्वी झाल्याचा दावा
मुंबई / वृत्तसंस्था
विराट कोहलीकडे ना ख्रिस गेलसारखी अफाट ताकद आहे, ना एबी डीव्हिलियर्सची क्षमता, पण, तरीही अव्वल दर्जाच्या तंदुरुस्तीमुळे तो टी-20 क्रिकेटमध्ये साम्राज्य गाजवू शकला आहे, असे रोखठोक प्रतिपादन माजी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरने पेले. गंभीर 2007 व 2011 विश्वचषक जेत्या संघाचा सदस्य राहिला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा तिन्ही क्रिकेट प्रकारातील विद्यमान कर्णधार विराट कोहली टी-20 प्रमाणेच कसोटी व वनडेमध्ये देखील यशस्वी ठरला आहे. यापैकी टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 82 सामन्यात 50.8 च्या सरासरीने 2794 धावा ठोकल्या आहेत.
‘विराट अतिशय कुशाग्र क्रिकेटपटू होता. पण, नंतर त्याने टी-20 क्रिकेटमध्ये अधिक यश संपादन केले. प्रचंड अव्वल दर्जाची तंदुरुस्ती, हे विराटचे बलस्थान आहे. ख्रिस गेलची ताकद, डीव्हिलियर्सची अफाट क्षमता, ब्रायन लारा, जॅक कॅलिस यांच्यासारखी हुकूमत याचा अभाव असतानाही विराट तंदुरुस्तीच्या या बलस्थानामुळेच तुफान यशस्वी ठरला’, असे गंभीरचे निरीक्षण आहे.
‘विराटची तंदुरुस्ती अफाट आहे आणि ती त्याने खेळात तंतोतंत उतरवली आहे. विराटचे रनिंग बिटविन द विकेट तर अफलातून आहे आणि यामुळे तो अन्य सर्व फलंदाजांमध्ये अधिक उजवा ठरत आला आहे’, असे गंभीर पुढे म्हणतो. विराट कोहली क्रिकेटच्या तीन पारंपरिक क्रिकेट प्रकारासह इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतही यशस्वी ठरला असून त्याने यातील 177 सामन्यात 5412 धावांची आतषबाजी केली आहे.
‘सध्याच्या स्थितीत प्रत्येक चेंडू आपल्याला हव्या त्या दिशेने मारु शकणारे फलंदाज खूपच कमी आहेत आणि यात विराट कोहली अतिशय अव्वल आहे. स्टाईक रोटेट करण्याच्या बाबतीत तो रोहित शर्मापेक्षाही अधिक सातत्यशील आहे. याचाच परिपाक म्हणून विराट ज्या वेगाने स्ट्राईक रोटेट करु शकतो, तसे रोहित शर्मा करु शकत नाही. रोहित उत्तूंग फटके मारु शकतो. पण, यातही कोहलीच अधिक सरस ठरतो. ख्रिस गेल किंवा एबी डीव्हिलियर्स यांच्याकडे स्ट्राईक रोटेट करण्याची क्षमता लक्षवेधी नाही. विराट येथेही उजवा ठरतो आणि याचमुळे त्याची सरासरी 50 पेक्षा अधिक आहे’, असे गंभीरने शेवटी नमूद केले.