रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचे मुख्य प्रशिक्षक हेस्सन यांचा दावा
अबु धाबी / वृत्तसंस्था
विराट कोहलीने आरसीबी नेतृत्वाचा राजीनामा दिला असला तरी हंगामात संघाच्या कामगिरीवर याचा अजिबात विपरित परिणाम होणार नाही, असा दावा या संघाचे मुख्य प्रशिक्षक माईक हेस्सन यांनी केला. विराट कोहलीने हंगामाअखेर आपण नेतृत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱयाच दिवशी आरसीबीचा केकेआरविरुद्ध 9 गडय़ांनी धुव्वा उडाला. त्या पार्श्वभूमीवर हेस्सन बोलत होते.
विराटने चुकीच्या वेळी ही घोषणा केली आहे का, या प्रश्नावर हेस्सन यांनी नकारार्थी उत्तर दिले. ‘माझ्या मते विकेंद्रीकरण टाळण्यासाठी ही घोषणा शक्य तितक्या लवकर करणे आवश्यक होते. सर्व संघसहकाऱयांना याची त्यापूर्वीच माहिती होती. पण, या निर्णयामुळे संघाचा पहिल्या सामन्यात पराभव झाला, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. केकेआरविरुद्ध विशेषतः फलंदाजीत आमचा घात झाला. आम्ही खेळपट्टीशी सुसंगत खेळ साकारला नाही, त्याचा फटका बसला. मात्र, या चुकीची दुरुस्ती करण्यात आमचा संघ यशस्वी ठरेल, याचा मला विश्वास वाटतो’, असे हेस्सन याप्रसंगी म्हणाले.
केकेआरच्या वरुण चक्रवर्तीने आरसीबीच्या फलंदाजी लाईनअपला चांगलाच सुरुंग लावत 13 धावात 3 बळी घेतले होते. त्याचा हेस्सन यांनी येथे उल्लेख केला. ‘चक्रवर्तीविरुद्ध फलंदाजी करणे कठीण जात होते. आम्ही ठरावीक अंतराने गडी गमावत राहिलो आणि समोर नवे फलंदाज येत राहिल्याने याचा लाभ घेत आक्रमक गोलंदाजी करणे त्याला शक्य झाले’, असे निरीक्षण त्यांनी पुढे नोंदवले.
‘टीम कम्पोझिशन अजिबात चुकीचे नव्हते. एकवेळ आम्ही 1 बाद 42 अशा स्थितीत होतो. त्यामुळे सर्वबाद 92 धावांवर गाशा गुंडाळला जाणे अजिबात अपेक्षित नव्हते. आम्ही किमान 150 धावांचा टप्पा सर करणे तरी आवश्यक होते. आम्हाला एबी डीव्हिलियर्सकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवत धोका स्वीकारायचा नव्हता. त्यामुळे अन्य काही बदल करावे लागले. डीव्हिलियर्स महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याची अधिक दमछाक होऊ नये, याकडे आमचा कटाक्ष असेल’, याचा हेस्सन यांनी पुढे उल्लेख केला.