हजारो मने जिंकणारा अजिंक्य रहाणे म्हणतो,
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिकाविजय साकारल्यानंतर अजिंक्य रहाणे हजारो चाहत्यांच्या गळय़ातील ताईत बनला असेल. पण, विराट हाच निर्विवाद कर्णधार आहे आणि मी उपनेता, संघसहकारी आहे, असे रहाणेने वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. संघाला ज्या-ज्यावेळी गरज असेल, त्यावेळी आपण विराटची जागा आनंदाने भरुन काढू, असे तो म्हणाला.
भारतीय संघ पाहुण्या इंग्लंडविरुद्ध दि. 5 फेब्रुवारीपासून पहिली कसोटी खेळेल, त्यावेळी विराट संघात परतलेला असेल आणि अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल. यावेळी नेमके काय बदललेले असेल, या प्रश्नावर रहाणे बोलत होता. रहाणेने आजवर 69 कसोटी सामने खेळले असून त्यात 42.58 च्या सरासरीने 4472 धावा केल्या आहेत, तसेच 87 झेलही घेतले आहेत. कसोटीत त्याच्या खात्यावर 12 शतके आहेत.
‘विराट कसोटी संघाचा कर्णधार होता आणि राहील. मी त्याचा उपनेता आहे. तो ज्यावेळी गैरहजर होता, त्यावेळी नेतृत्व साकारणे आणि संघाला यशश्री मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणे, हे माझे कर्तव्य होते. माझ्या दृष्टीने आपण कर्णधार आहोत का, हे महत्त्वाचे नाही. ती जबाबदारी असताना आपण ती चोख पार पाडली का, हे महत्त्वाचे आहे. आजवर मी त्यात यशस्वी ठरलो आहे. भविष्यातही संधी मिळेल, त्यावेळी मी सर्वोत्तम प्रयत्न करेन’, असे अजिंक्य येथे म्हणाला. मध्यफळीतील या दिग्गज खेळाडूने आजवर 5 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व साकारले असून त्यात 4 वेळा विजय मिळवून दिला आहे तर एक लढत अनिर्णीत राहिली आहे.
विराटशी मैत्रीचे नाते
‘माझ्यात व विराटमध्ये मैत्रीचे नाते आहे. अनेकदा त्याने माझ्या फलंदाजीची प्रशंसा केली आहे. आम्ही दोघांनीही घरच्या भूमीत आणि विदेशात संस्मरणीय डाव साकारले आहेत. विराट चौथ्या व मी पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरत असल्याने अनेकदा आम्ही उत्तम भागीदारी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हा दोघात पारदर्शकता आहे आणि परस्पराविषयी आदरही आहे. आम्ही दोघे एकमेकांना परस्परपूरक भूमिका बजावत असतो आणि ज्यावेळी एकजण चुकीचा फटका खेळतो, त्यावेळी दुसरा सावध करतो. क्रीझवर असताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांची रणनीती काय असू शकते, याची आम्ही चर्चा करत असतो’, असे रहाणेने पुढे नमूद केले.
विराट हा कुशल कर्णधार आहे आणि मैदानावर तो चांगले निर्णय घेतो. अश्विन, जडेजासारखे फिरकी गोलंदाज तैनात असताना स्लीपमध्ये माझ्याकडून त्याला उत्तम झेल घेण्याची अपेक्षा असते. त्याच्या विश्वासाला तडा जाणार नाही, हा माझाही प्रयत्न असतो’, असे या उत्तम क्षेत्ररक्षकाने नमूद केले. कसोटी क्रिकेटमध्ये रहाणेच्या खात्यावर सध्या 87 झेल आहेत.
‘संघातील जागा धोक्यात आहे, असे मला कधीही वाटले नाही. कर्णधार व संघव्यवस्थापनाचा माझ्यावर विश्वास आहे. काही वेळा एखाद-दुसऱया मालिकेत खराब फॉर्म असतो. पण, त्यातून बाहेर येण्यासाठी एक उत्तम खेळी देखील पुरेशी ठरु शकते. अर्थात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाविजय संपादन केल्याचे सर्व श्रेय कर्णधार या नात्याने मला दिले गेले, ते योग्य वाटत नाही. तो सांघिक विजय होता आणि संघ उत्तम खेळला तरच त्या संघाचा कर्णधार यशस्वी ठरतो, उत्तम ठरतो, असे रहाणेने शेवटी नमूद केले.
बॉक्स
भारत-इंग्लंडचे संघ चेन्नईत दाखल
चेन्नई ः कर्णधार जो रुटसह इंग्लिश क्रिकेट संघातील अन्य खेळाडू बुधवारी चेन्नईत दाखल झाले तर काही भारतीय खेळाडू व भारतीय संघाच्या प्रशिक्षण पथकातील काही सदस्य देखील येथे पोहोचले आहेत.
रुट व त्याचे सहकारी बुधवारी सकाळी 10.30 च्या दरम्यान लंकेतून चेन्नईत दाखल झाले आणि विमानतळावरुन ते थेट आपल्या हॉटेलकडे रवाना झाले, असे तामिळनाडू क्रिकेट संघटनेने नमूद केले.
इंग्लंडचा संघ यापूर्वी लंकन दौऱयात यजमान संघाचा 2-0 असा धुव्वा उडवण्यात यशस्वी ठरला. कर्णधार जो रुटने त्या मालिकेत 2 तडफदार शतके झळकावली. त्या दौऱयात समाविष्ट नसलेले खेळाडू अष्टपैलू बेन स्टोक्स व जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर यापूर्वीच भारतात दाखल झाले असून त्यांच्या क्वारन्टाईन कालावधीला एव्हाना सुरुवातही झाली आहे.
भारतीय संघातील स्टार फलंदाज रोहित शर्मा, कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे मंगळवारी रात्री चेन्नईत पोहोचले तर चेतेश्वर पुजारा, जसप्रित बुमराह, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीतील हिरो ऋषभ पंत बुधवारी सकाळी येथे दाखल झाले. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मुंबईतून चेन्नईत आले. कर्णधार विराट कोहली बुधवारी रात्री संघात दाखल होणे अपेक्षित होते.
बायो-बबल प्रोटोकॉलनुसार दोन्ही संघ चेन्नईतील हॉटेल लीला पॅलेसमध्ये वास्तव्यास असतील आणि त्यांच्यासाठी क्वारन्टाईन कालावधी 6 दिवसांचा असणार आहे. चेन्नईत दि. 5 फेब्रुवारीपासून पहिली कसोटी सुरु होईल. डिसेंबर 2016 नंतर चेन्नईत एकही कसोटी सामना झालेला नाही. 5 वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्धच येथे शेवटची कसोटी झाली होती. दुसरी कसोटीही याच मैदानावर होणार आहे.