ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी रोहितचा समावेश, जखमी वरुण चक्रवर्ती बाहेर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया पहिल्या कसोटीनंतर भारतीय कर्णधार विराट कोहली ‘ब्रेक’ घेणार असून त्याची रजा बीसीसीआयने मंजूर केली आहे. तसेच वनडे व टी-20 संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा कसोटी संघात समावेश केला आहे. धोंडशिरेच्या दुखापतीमुळे आधी जाहीर केलेल्या संघात त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. याशिवाय स्पिनर वरुण चक्रवर्ती जखमी असल्याने त्यालाही टी-20 संघातून वगळण्यात आले आहे.
जानेवारीच्या प्रारंभी कोहलीची पत्नी अनुष्का शर्माची डिलिव्हरी होणार असल्याने तिच्यासमवेत कोहलीला रहावे लागणार आहे. त्यामुळे या मालिकेतील तीन कसोटी त्याला हुकरणार आहेत. ‘कोहलीने बीसीसीआयला याबाबतची माहिती दिली असून पहिली कसोटी झाल्यानंतर तो मायदेशी परतणार आहे आणि बीसीसीआयने त्याची रजा मंजूर केली आहे,’ असे सचिव जय शहा यांनी सांगितले. बीसीसीआयशी मध्यवर्ती करार केलेले खेळाडू अशी रजा घेण्यास पात्र असून यापूर्वी रोहित शर्मानेही 2018 मधील ऑस्ट्रेलिया दौऱयावेळी याचा लाभ घेतला होता. ऑस्ट्रेलिया दौऱयात भारताच्या तीन वनडे, तीन टी-20 व चार कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहेत. या मालिकेची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होत असून कसोटी मालिकेची सुरुवात 17 डिसेंबरला ऍडलेडमधील डे-नाईट कसोटीने होणार आहे. कोहलीला मेलबर्नमध्ये होणारी बॉक्सिंग डे कसोटी (26-30 डिसेंबर), नववर्षात सिडनीत होणारी कसोटी (7-11 जानेवारी) आणि ब्रिस्बेनमध्ये होणारी (15-19 जानेवारी) शेवटची कसोटी हुकणार आहे.
कोहलीच्या गैरहजेरीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मात्र नुकसान होण्याची शक्यता असून त्याचीच त्यांना चिंता लागली आहे. या मालिकेचे ब्रॉडकास्टर सेव्हन नेटवर्क यांच्या रोषाची त्यांना याआधीच झळ पोहोचली आहे. कोहली हे आकर्षण केंद्र असल्याने त्याच्या गैरहजेरीमुळे जाहिरातीवर मोठा परिणाम होऊ शकतो आणि महसूल कमी होऊ शकतो, असे त्यांना वाटत आहे.
रोहितचा कसोटीत समावेश
जय शहा यांनी रोहित शर्माच्या फिटनेसचा तपशीलही दिला असून तो वनडे व टी-20 मालिकांत खेळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याच्या फिटनेसवर नजर ठेवली असून त्याचा तपशील निवड समितीला त्यांनी दिला आहे. रोहितशी चर्चा केल्यानंतर त्याला वनडे व टी-20 मालिकांसाठी विश्रांती देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे कसोटी मालिकेसाठी त्याला संघात निवडण्यात आले आहे,’ असे त्यांनी सांगितले. आयपीएल झाल्यानंतर रोहित शर्मा मायदेशी परतणार असून इशांत शर्मासह तो दुखापत पुनर्वसन प्रक्रियेत भाग घेणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात तो ऑस्ट्रेलियास रवाना होणार आहे. इशांत शर्मा पूर्ण फिट झाल्यास त्याचाही कसोटी संघात समावेश केला जाऊ शकतो, असे बीसीसीआने सांगितले.
वरुण चक्रवर्तीही जखमी
गूढ स्पिनर वरुण चक्रवर्तीही जखमी असल्याने टी-20 मालिकेतून तो बाहेर पडला आहे. खांद्याला दुखापत झाल्याचे लपवून त्याने आयपीएलमधील सामन्यात भाग घेतला. आता त्याच्या जागी टी-20 संघात टी. नटराजनचा समावेश करण्यात आला असल्याचे बीसीसीआयने सांगितले. चक्रवर्तीच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. अशा स्थितीतही त्याने केकेआरच्या सामन्यात खेळणे चालू ठेवले होते, बीसीसीआयने त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याने आयपीएलमध्ये 16 बळी टिपले असून यॉर्कर्स टाकण्यात तो तरबेज आहे. कमलेश नागरकोटीही ऑस्ट्रेलियाला जाणार नसून त्याच्यावरील वर्कलोडचे बीसीसीआय निरीक्षण करीत आहे. संजू सॅमसनला फक्त टी-20 संघात निवडण्यात आले होते, आता त्याला जादा यष्टिरक्षक म्हणून वनडे संघातही ठेवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी निवडण्यात आलेले सुधारित भारतीय संघ
टी-20 : कोहली (कर्णधार), धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, संजू सॅमसन, जडेजा, वाशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, बुमराह, शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी.नटराजन.
वनडे संघ : कोहली (कर्णधार), धवन, शुभमन गिल, राहुल (उपकर्णधार), अय्यर, पांडे, हार्दिक, अगरवाल, जडेजा, चहल, कुलदीप यादव, बुमराह, शमी, सैनी, शार्दुल ठाकुर, सॅमसन.
कसोटी संघ : कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, अगरवाल, पृथ्वी शॉ, राहुल, पुजारा, हनुमा विहारी, गिल, साहा, ऋषभ पंत, बुमराह, शमी, उमेश यादव, सैनी, कुलदीप यादव, जडेजा, आर.अश्विन, मोहम्मद सिराज.